हृदयाला भिडते ते गीत रसिकांना आपले वाटते. गोडवा असणं हीच गाण्याची खरी ओळख, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ‘मेलडी’ आणि ‘हार्मनी’ यामध्ये मी ‘मेलडी’ला महत्त्व देतो, असेही त्यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमात पत्की यांची नाटक, चित्रपट, मालिकांची शीर्षक गीते आणि जाहिरातीसाठीच्या गीतांचे संगीत अशी अर्धशतकी वाटचाल त्यांच्याशी झालेल्या दूरचित्र संवादातून उलगडली. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम आणि निवेदिका स्मिता गवाणकर यांनी पत्की यांच्याशी संवाद साधला. विविध प्रकारच्या गीतांचे सप्तसूर सादर करून पत्की यांनी या गप्पांमध्ये रंग भरले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. गाण्याची प्रक्रिया उलगडताना पत्की म्हणाले, शब्दांमध्येच सगळं दडलेलं असतं. आधी कविता असेल तर चाल लावायला सोपे जाते. पूर्वी गदिमा, शांता शेळके, जगदीश खेबुडकर यांच्यासारखे दिग्गज आधी गाणे लिहायचे. संगीतकाराने चाल दिल्यावर ते ध्वनिमुद्रित केले जायचे. नंतरच्या टप्प्यावर आधी संगीत आणि मग शब्द असा प्रकार हिंदी चित्रपटगीतांमध्ये सुरू झाला. तेच मराठीमध्ये आले. संगीत देताना शब्दांची कशीही फोड करण्याचे स्वातंत्र्य घेता येते. चाल कधी लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. मनाला भिडली नाही तर ती चाल नाही, असे मी मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या सुरावटी करण्याची माझी तळमळ असते. पं. जितेंद्र अभिषेकी यांचा सहायक आणि सुमन कल्याणपूर यांचा संवादिनीवादक ते अशोकजी परांजपे यांच्या प्रोत्साहनामुळे झालेला स्वतंत्र संगीतकार हा प्रवास पत्की यांनी मांडला. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ या गीताच्या संगीतामध्ये बंगाली संगीतामधील केलेल्या संचारी प्रयोगाला सी. रामचंद्र यांनी दाद दिली होती, ही आठवण त्यांनी सांगितली. मुखडय़ाचे कवी एकदा मला चाल सुचली. त्यामध्ये मी डमी शब्द घालून गीत तयार केले. शांताराम नांदगावकर यांना मी ते शब्दांसह ऐकविले. ‘इतके छान शब्द आहेत की मुखडा हाच ठेवू. अंतरे मी लिहितो’, असे नांदगावकर यांनी मला सांगितले. तेव्हापासून मी मुखडय़ाचा कवी झालो, असा किस्सा अशोक पत्की यांनी सांगितला. अशाच डमी शब्दांचा वापर असलेले ‘तू सप्तसूर माझे’ हा मुखडा ऐकल्यानंतर या गीताचे मुखडे तुम्हीच लिहावेत, असा आग्रह सुरेश वाडकर यांनी धरला आणि मी कवी झालो, अशी आठवण त्यांनी सांगितली.