महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक भाषणांमध्ये, लवकरच राज्यात भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करताना दिसतात. भाजपाचे इतरही अनेक नेते अशाप्रकारची विधाने करताना दिसून येतात. याबद्दल आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांची खिल्ली उडवली. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी म्हणतात की भाजपा पुन्हा सत्तेत येणार आहे. जेव्हा ते असं म्हणतात तेव्हा समजून जा की त्यांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झालेली आहे. ते अस्वस्थ असतात. घरवापसीच्या निमित्ताने कोणी राष्ट्रवादी, कोणी काँग्रेस तर कोणी शिवसेनेत जाण्यास निघालेले आहेत. त्यांना रोखण्यासाठी असं भाजपाचे नेतेमंडळी बोलतात. भाजपा सत्तेत येणार हे हल्ली फडणवीस यांच्या भाषणाचं ध्रुवपद झालं आहे", अशी खिल्ली बाळासाहेब थोरात यांनी उडवली. देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी बोलतही नाहीत हे दुर्दैवी! "देशाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारचे आंदोलन होत आहे. मागील ६० दिवसांपासून लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीत घेराव घालून शेतकरी बसले आहेत. तरीदेखील देशाचे प्रमुख शेतकर्यांशी बोलत नाहीत. गृहमंत्री कोणत्या तरी राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जातात. ही त्यांची उदासीनता आणि बेफिकिरी अंत्यत दुर्देवी आहे", असं थोरात म्हणाले. कृषी कायद्यात राज्य पातळीवर आवश्यक ते बदल करणार! "कृषी विधेयक कायद्याबाबत राज्यपातळीवर अनेक वेळा चर्चा झाली आहे. या संदर्भात समिती स्थापन करून त्या समितीच्या शिफारशींनुसार शेतकरी आणि सामान्य जनता या दोघांच्या हिताच्या दृष्टीने कायद्यात बदल करण्यात येतील", अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. सत्तेच्या काळजीपोटी भाजपाची अण्णांना विनंती! "अण्णा हजारे यांनी आजपर्यंत ज्या चुकीच्या गोष्टी घडल्या तेव्हा आंदोलन आणि उपोषण केले. त्यांच्या लढ्यामुळे अनेकदा कायदे मागे घ्यावे लागले. आता शेतकर्यांवर होणारा अन्याय त्यांना सहन होत नसल्याने ते उपोषण करण्याच्या विचारात आहेत. पण अण्णांच्या तब्येतीची काळजी वाटते असं सांगून भाजपा त्यांना उपोषण न करण्याची विनंती करत आहे. भाजपाला सत्तेची काळजी असल्याने असा प्रकार केला जात आहे", अशी टीका त्यांनी केली.