शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे ओळखले जातात. सामनामधून ते विरोधकांवर कायमच जहरी टीका करत असतात. पण त्यांची लेखनाची भाषा ही वृत्तपत्रातील लिखाणाच्या शिष्टाचाराला अनुसरून नसल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली. त्याचबाबत बोलताना त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

“आमच्यावर काय टीका केली आहे हे पाहण्यासाठी आम्ही सामना नेहमीच वाचतो. मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार हे समजल्यावर त्याला तक्रारीचं रूप संजय राऊतांनी दिलं आणि माझ्यावर पुन्हा नव्याने टीका केली. राऊत आता मला घाबरतायत असं ते म्हणाले. यातून हेच स्पष्ट दिसून येतं की ते बहुदा रश्मी ठाकरे यांना फारसे घाबरत नाहीत. त्यांच्या अशा वक्तव्यानंतर, ‘कोण रश्मी वहिनी (ठाकरे)?’ असं बहुतेक संजय राऊतांचं म्हणणं असावं असं दिसतंय”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांनी पत्र लिहिलं. त्या पत्राची कॉपी त्यांनी फेसबुकवरही पोस्ट केली.

याच पत्राबाबत त्यांनी पत्रकारांनाही प्रतिक्रिया दिली. “मी लिहिलेलं पत्र रश्मी वहिनींना पाठवलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून ज्या प्रकारची भाषा वापरली जाते त्याबद्दलचा आक्षेप मी त्या पत्रात नोंदवला आहे. त्या पत्रात मी रश्मी वहिनींना उद्देशून असं लिहिलं आहे की मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही सुसंकृत आहात हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला ही भाषा आवडत नसेल असं मला वाटतं. तुम्ही सामनाच्या संपादिका आहात. त्यामुळे सामनामध्ये जे जे लिहिलं जात, त्याला तुम्ही सहमत आहात असा अर्थ होतो. त्यानुसार खरंच तुम्ही सहमत असाल, तर माझी काही हरकत नाही. माझ्या तुम्हाला शुभेच्छा!”, असंही ते म्हणाले.