पिंपरी : भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये असलेली कटूता कमी करण्यासाठी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या मावळच्या समन्वय बैठकीस भाजपचे आमदार आणि पिंपरीचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप शहरात असूनही उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही बैठकीकडे पाठ फिरवल्याने युतीतील दुरावा कायम असल्याचे दिसून आले. खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र याच बैठकीत वाटण्यात आल्याने काही काळ गोंधळ उडाला.

पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभेसाठी आकुर्डी-काळभोरनगरला तर शिरूर लोकभेसाठी भोसरीत समन्वय बैठक पार पडली. मावळच्या बैठकीत खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते. तर, शिरूर लोकसभेसाठी झालेल्या बैठकीत खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार महेश लांडगे, बाबुराव पाचर्णे, योगेश टिळेकर, शरद सोनवणे, सुरेश गोरे, महापौर जाधव आदी उपस्थित होते.

आकुर्डीतील बैठकीस अपेक्षेप्रमाणे आमदार जगताप व त्यांचे समर्थक उपस्थित राहिले नाहीत. जगताप पूर्वपरवानगीने गैरहजर राहिल्याची सारवासारव बापट यांनी केली. मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकद राहिली नसून त्यांना पिंपरी-चिंचवडमधूनही हद्दपार करण्यात आले आहे. निष्पाप शेतकऱ्यांवर त्यांनी गोळीबार केला असा आरोप बारणे यांनी यावेळी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे काळू-बाळूचा तमाशा

पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे. गेल्या ७० वर्षांत जे काँग्रेसला जमले नाही, ते भाजप सरकारने करून दाखवले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे काँग्रेसचेच पाप आहे, असे बापट म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्याविषयी केलेल्या विधानांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशी करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली. डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत गेल्याचा पश्चात्ताप निवडणुकीनंतर झालेला असेल आणि पार्थ पवारला कोणी ओळखत नाही, अशी टीका त्यांनी केली.