विधान परिषद निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारल्याने पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातून ऐनवेळी त्यांचं तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषेदसाठी उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन दिलं असल्याचा उल्लेख मेधा कुलकर्णी यांनी केला होता. पण पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यादी जाहीर होताच मेधा कुलकर्णी यांनी ट्विटरला एका पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत “आज फिर दिल ने एक तमन्ना की….आज फिर दिल को हमने समझाया” हे गाण्याचे शब्द लिहिलेले आहेत. मेधा कुलकर्णी यांनी भाजपाचा उल्लेख केला नसला तरी उमेदवारी न दिल्याने आपणच आपली समजूत घातली असल्याचं  ट्विटमधून स्पष्ट दिसत आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

उमेदवारी न मिळाल्याने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, “आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस…साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद”.

विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे आदी विधानसभेच्या वेळी उमेदवारी नाकारलेले किंवा पराभूत झालेले इच्छूक होते. भाजपमधील पक्षांतर्गत शीतयुद्धात खडसे, मुंडे, तावडे यांना संधी मिळू नये, असाच प्रयत्न सुरू होता. एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास अन्य नेत्यांवर अन्याय केल्यासारखे झाले असते. यातूनच माजी मंत्र्यांचा नावांचा विचार झाला नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.