राज्यातील टोलच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात उल्लेख नाही. जनमत चाचण्यांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असताना पक्षाने टोलबाबतची भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
टोलच्या जिजिया कराबाबत राज्यात प्रचंड असंतोष आहे. याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी ‘टोलचा खेळ मीच सुरू केला आणि तो मीच संपवणार’ असे उद्गार काढले होते. त्यामुळे भाजपच्या दृष्टिपत्रात याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट होईल, अशी जनतेला अपेक्षा होती. परंतु, शनिवारी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या दृष्टिपत्रात चुकून किंवा जाणून बुजून याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असताना या विषयावर त्यांनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे, अशी मागणी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे.