मी ज्या राज्यांमध्ये गेलो तिथे भाजपाचा पराभव झाला आहे. आता महाराष्ट्रात आलो आहे त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपाचा पराभव निश्चित आहे असे भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या महात्मा फुले वाड्याला आझाद यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी भाजपावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदीही २०१९ मध्ये सत्तेवर राहणार नाहीत असेही म्हटले आहे. फुले वाड्याला भेट दिल्यानंतर त्यांनी लाल महाल या ठिकाणी भेट दिली त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

एवढंच नाही तर मला भीमा कोरेगाव या ठिकाणी जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असेही आझाद यांनी म्हटले आहे. भीमा कोरेगावल मी जाणार आणि महाराष्ट्रात भीम आर्मी संघटना बळकट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. माझा काहीही गुन्हा नसताना मला नजरकैदेत ठेवण्यात आलं. भीमा कोरेगाव या ठिकाणी दंगल घडवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे मात्र खुलेआम फिरत आहेत. मला नजरकैदेत का ठेवलं? मी दहशतवादी आहे का? असाही प्रश्न आझाद यांनी विचारला.