firasta-blog_ambar-karve-670x200

नावावरूनच लक्षात येणारी राजवाडे आडनावाच्या कुटुंबाची कथा.आडनावाला साजेसे हे लक्ष्मी ज्यांच्या घरी पाणी भरते असे हे कुटुंब आहे.अगदी बडजात्या,चोप्रांच्या चित्रपटात शोभेल असे.
ह्यात झगडा आहे पण अॅक्शन नाही,मोजक्या सुंदर नव्याकोर्या कविता असल्या तरी उगाच प्रत्येक प्रसंगाला ओढून आणलेली भरमसाठ गाणी नाहीत.हिरोईन आहेत पण त्या शोभेच्या बाहुल्या नाहीत.त्यांना त्यांचा स्वतःचे अस्तित्व आहे.
अहंकारामुळे तयार झालेली तीन पिढ्यांमधली ‘जनरेशन गॅप’ हा विषय दिग्दर्शक सचिन कुंडलकरनि अतिशय सुंदर हाताळला आहे.ह्यात मधली पिढी म्हणून उल्लेख होणारे सचिन खेडेकर,अतुल आणि मृणाल कुलकर्णी हे त्यातून नकळतपणे आपल्या आपल्या पद्धतीने कसा मार्ग काढतात ते नक्कीच बघण्यासारखे आहे.
कुटुंब प्रमुख सतीश आळेकर ह्यांचा सराफी व्यावसायिक आलोक नाथ सारखा गुळगुळीत नाहीये,त्याच्यात करारीपणा आहे,त्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवलेला उद्योगपतीचा सार्थ अभिमान त्यापेक्षाही गर्व आहे ,आणि ते दाखवण्यात ते कुठलीही कंजुषी करत नाही.
ज्योती सुभाष आपल्या समृद्ध अभिनयाच्या आणि अनुभवाच्या जोरावर ग्रामीण आईच्या पडलेल्या छापातून सहज बाहेर आल्या आहेत.धनाढ्य उद्योगपतीची तरीही मनानी साधी बायको असणे,स्वतःच्या इच्छेला फार वाव मिळालेला नसल्याने त्यांची झालेली घुसमट,जुन्या घराबद्दल असणारी त्यांची आत्मीयता,जुन्या घरातून नवीन घरात जाणे, नातवंडांच्या बरोबरीने असलेले त्यांचे ‘टेक्नोसेंव्ही ‘असणे हे भाव खावून जाते.
त्यांची मुले असलेली सचिन खेडेकर,अतुल कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी ह्या तिघांच्या अभिनयाच्या बाबतीत काय बोलायचे ? तिघेही आपले ‘रोल’ जगलेत.उद्योगपतीच्या मुलांच्या आयुष्यातली ‘तगमग’ तिघांनीही एकापेक्षा एक दाखवल्ये.त्यातही प्रत्येकाच्या ‘रोल’च्या छटा वेगळ्या असल्याने त्यांच्यात उगाच अभिनयाची खोटी स्पर्धा नाही.पण सचिन खेडेकरांचा ‘विद्याधर ‘कायमच लक्षात राहील असा.अतुल कुलकर्णींची रोलची दोन रूपे दाखवून मजा केल्ये.मृणाल कुलकर्णी नेहमीप्रमाणेच संयत अभिनय दाखवून जाते.किंचित खलनायकी झाक असलेल्या,घरजावई झालेल्या राहुल मेहेंदळेला ज्या २-३ प्रसंगात वाव मिळालाय,त्यात तो अपेक्षेला उतरला आहे.
तिसरी पिढी झालेले सिद्धार्थ मेनन ह्याचा मनमौजी विराजक ,आलोक राजवाडे आपली भूमिका चांगलीच निभावून नेतात. आजच्या पिढीचे एकंदर विचार व्यक्त करण्यात दोघांनीही कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही.
मृण्मयी गोडबोले,कृतिका देव ह्यांचा अभिनय दखल घ्यायला लावणारा.अम्रितयान पाटील ह्यांचा विक्रम छान.
तेजस मोडक ह्यांचे शब्द ,देबर्पितो सहा ह्यांनी दिलेल्या संगीतावर शंकर महादेवन ह्यांनी म्हणलेले ‘मोकळे’ हे गाणे केवळ सुखद.
एकूणच मराठी सिनेमा उच्च निर्मितीमूल्य आत्मसात करायला लागल्याचे मोठे उदाहरण म्हणून “राजवाडे & सन्स” कडे बघता येईल,फक्त त्यात श्रीमंती दाखवताना चित्रपटाचा आत्मा असणारा “अभिनय,दिग्दर्शन”लपून गेलेला नाही.
फक्त ..एवढे सगळे दाखवताना प्रत्यक्ष कोणीच काम न करणे आणि सतत पैसे खर्च करण्याच्या मार्गावर असणे हे ह्याचे हिंदी चित्रपटाच्या जवळ जाणे दृष्ट लागण्यासारखे खटकतं.
पण उगाच हिरो,हिरोईनच्या प्रेमात लोंबकळत राहिलेला हा चित्रपट नाही.मल्टीस्टारर असला तरी ह्यातल्या प्रत्येक जण ह्यात असणे ही चित्रपटाची गरज वाटते.
संपूर्णपणे पुणे-मुंबईचा ‘मल्टीप्प्लेक्सच्या ऑडीयंस’ चा चित्रपट असला तरी ‘जनरेशन गॅप’ हा मूळ विषय न विसरणे ह्यातच दिग्दर्शक सचिन कुंडलकरचे कौशल्य लक्षात येतं.
एकूणच बऱ्याच दिवसांनी खऱ्या अर्थाने ‘कंटेंपररी’मराठी चित्रपट म्हणावा असा ‪#‎RajwadeAndSons

अंबर कर्वे