माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा फेरतपास करण्यात येणार असून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली स्पेशल क्राईम ब्रांचकडे आता हा तपास सोपविण्यात आला आहे. शेट्टी यांच्या हत्येसंदर्भात तपासदरम्यान लोणावळा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी जानेवारी २०१४ मध्ये २१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये काही माहिती महत्वाची हाती लागल्याने शेट्टी यांच्या हत्येचा फेरतपास करण्यात येणार आहे. हा तपास दिल्लीकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्या कांचन प्रसाद यांनी दिली आहे.
सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला विरोध करत सतीश यांचे बंधू संदीप यांनी न्यायालयात धाव घेतली होती. शेट्टी यांच्या हत्येमागील हेतू शोधण्यासाठीच म्हैसकर यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या फेरतपासाची मागणी सीबीआयने केली आणि न्यायालयानेही प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले होते.
असे असताना सीबीआय शेट्टी यांच्या हत्येचे प्रकरण बंद करण्याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयात सादर कसा करू शकते, असा सवाल संदीप यांनी उपस्थित केला होता. शेट्टी यांच्या लोणावळा येथील तक्रारीचा फेरतपास करण्याची परवानगी सीबीआय-एसीबीने हायकोर्टाकडे मागितली. ती न्यायालयाने मान्य केली पण त्यानंतर काही दिवसातच अचानक सीबीआयने ऑगस्ट २०१४ मध्ये शेट्टी हत्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. काही दिवसातच पुन्हा सीबीआय-एसीबीने ६ जानेवारी २०१४ ला आयआरबी कंपनीशी संबंधित काही कार्यालय आणि घरांवर छापे टाकत तपासणी केली. त्यानंतर आता हा तपास सीबीआय दिल्लीच्या स्पेशल क्राईम ब्रांचकडे सोपविण्यात आला आहे.