अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्य़ातील पिकांचे जे नुकसान झाले त्याची पाहणी केंद्रीय पथकाकडून अद्यापही झालेली नाही. याबाबत काही कळवण्यात आले नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय पथकाने पहिल्या टप्प्यात नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथे जाऊन पाहणी केली आहे. जिल्ह्य़ात अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाले असून कोरडवाहू, बागायती आणि फळपिकांचे मिळून एकूण एक लाख १५ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ातील एक लाख २० हजार शेतकरी बाधित झाले आहेत. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक २७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून राज्य शासनाकडे गेल्या महिन्यात पाठवला आहे. बाधित क्षेत्रामध्ये भात, सोयाबीन, ऊस, भुईमूग, कापूस, ज्वारी या पिकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान जुन्नर तालुक्यात झाले असून तुलनेने सर्वात कमी नुकसान भोर तालुक्यात साडेपाचशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले आहे. दरम्यान, अवकाळीने नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी आठ हजार रुपये, तर फळबागायती / बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केली होती. मदतीबाबत राज्य सरकारने सात हजार २०७ कोटींचा प्रस्ताव केंद्राला पाठवला असून त्याची दखल घेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) पथक राज्यात पाठवण्याचा निर्णय केंद्राने घेतला. त्यानुसार औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक विभागात पाहणी करण्यात आली. मात्र, अद्यापही पुणे जिल्ह्य़ात केंद्रीय पथक पाहणीसाठी आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नुकसान झालेले तालुके (कंसात क्षेत्र हेक्टरमध्ये) जुन्नर (२७ हजार), बारामती (१७ हजार), आंबेगाव (१५ हजार ८००), पुरंदर (११ हजार), इंदापूर (सात हजार ५००), मावळ (पाच हजार ५००), हवेली (चार हजार ५००), शिरूर (चार हजार), मुळशी (एक हजार ५००), वेल्हे (८००) आणि भोर (५५०).