पुण्याच्या चैतन्य वशिष्ठ या विद्यार्थ्यांने यंदाच्या ‘नासा’च्या ‘स्पेस सेटलमेंट’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. चैतन्य पुण्यातील ‘सेंट आरनॉल्डस् सेन्ट्रल स्कूल’मध्ये सातवीत शिकतो.
‘नासा एएमइएस’ आणि ‘नॅशनल स्पेस सोसायटी’ या संस्थांतर्फे दरवर्षी ही स्पर्धा घेतली जात असून जगभरातील बारावीपर्यंतचे शालेय विद्यार्थी त्यात भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत ‘माणूस अवकाशात राहायला जाणे कसे शक्य होऊ शकेल?’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपापले प्रस्ताव तयार करून पाठवायचे होते. सातव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या गटात चैतन्यने पाठवलेला प्रस्ताव पहिला आला आहे.
‘ब्रह्मा’ असे त्याच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाचे नाव होते. अवकाश स्थानकाचे भाग बनवताना ‘थ्री-डी प्रिंटिंग’ तंत्राचा किंवा नॅनोटेक्नोलॉजीचा वापर करता येईल का, अवकाशात टिकणारे अन्न तयार करताना मूळ पेशींच्या ‘कल्चर’चा उपयोग करता येईल का, कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन यंत्रणा वापरता येईल का, असे मुद्दे चैतन्यने या प्रस्तावात मांडले आहेत.