चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा भाग म्हणून काढण्यात आलेली ‘चिन्मय ज्योती यात्रा’ गुरुवारी (३१ डिसेंबर) पुण्यामध्ये येत आहे. ढोल-ताशांच्या निनादामध्ये कोळवण (ता. मुळशी) येथील चिन्मय विभूती आश्रमात दुपारी बारा वाजता चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी तेजोमयानंद यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेचे भव्य स्वागत केले जाणार आहे. या वेळी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म ८ मे १९१६ रोजी केरळमधील एर्नाकुलम या गावी झाला होता. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून स्वामीजींच्या जन्मगावी ८ मे २०१५ रोजी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्कुल कलाम यांच्या उपस्थितीमध्ये जन्मशताब्दीचा शुभारंभ झाला होता. तर, दिल्ली येथे झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामी चिन्मयानंद यांच्या स्मरणार्थ विशेष नाणी चलनात आणण्याचा कार्यक्रम झाला होता. एर्नाकुलम येथे प्रारंभ झालेली चिन्मय ज्योती यात्रा ही २३८ दिवसांची संपूर्ण भारत यात्रा आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्या दिव्य संदेशाची चिन्मय संदेश वाहिनी ही देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व केंद्रांमध्ये घेऊन जाणारी विशेष बस आहे. हा संदेश दिव्यातील ज्योतीप्रमाणे तेजस्वी आणि ज्ञानप्रकाश स्वरूप आहे, हेच या ज्योती यात्रा आणि संदेश वाहिनीचे प्रयोजन आहे. उपनिषदातील ज्ञान आधुनिक पद्धतीने कथन करणारे स्वामी चिन्मयानंद हे २० व्या शतकातील आधुनिक संत होते. पुण्याच्या रास्ता पेठेतील गणपती मंदिरामध्ये स्वामी चिन्मयानंद यांच्या पहिल्या प्रवचानाने चिन्मय मिशनच्या कार्याचा श्रीगणेशा झाला. येथूनच त्यांच्या कार्याची व्याप्ती देशभर वाढली. हे ध्यानात घेऊनच मिशनने कोळवण येथे चिन्मय विभूती आश्रमाची स्थापना केली आहे. पुणे आणि परिसरामध्ये त्यांचे साधक आहेत. चिन्मय ज्योती यात्रा वर्षांच्या अखेरीच्या दिवशी कोळवण येथे येणार असल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी आणि संगीतकार हिमांशू नंदा यांनी दिली.