महाविद्यालयांमध्ये विशाखा समित्या नसणे, विविध संघटना, संस्थांचालक यांच्या दबावामुळे या समित्यांकडे आलेल्या तक्रारी न स्वीकारणे अशा महिला शिक्षिकांच्या तक्रारींवर शुक्रवारी विधान परिषदेत चर्चा झाली. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत विशेष सूचना मांडली.
महाविद्यालयांमध्ये विशाखा समित्या नसल्यामुळे महिला कर्मचारी आणि शिक्षिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याबाबत ‘लोकसत्ता’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अनेक महाविद्यालयांमध्ये विशाखा समित्या कागदोपत्री आहेत. काही ठिकाणी समित्यांचे प्रमुख हे पुरूष आहेत. संस्थाचालक, संघटना यांच्या दबावामुळे तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत. आरोप सिद्ध होऊनही संस्थांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. महिलांनाच बदनामीची धमकी दिली जाते, अशा अनेक तक्रारी महिलांनी ‘लोकसत्ता’कडे केल्या होत्या.
महिला कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांबाबत डॉ. गोऱ्हे यांनी विधान परिषदेत सूचना मांडली. ‘महाविद्यालयांमध्ये विशाखा समित्या स्थापन व्हाव्यात आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत शासनाने लक्ष घालावे,’ अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.