रत्नागिरीतून पिंपरी पालिकेत आलेल्या राजीव जाधव यांनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना आपली कार्यपद्धती स्पष्ट केली. दिशाभूल करू नका, वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडा आणि निलंबनासारखी कठोर कारवाई करण्याची वेळ आणू नका, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी आयुक्त श्रीकर परदेशी यांच्याकडून जाधव यांनी काल पदभार स्वीकारला. तेव्हा परदेशी यांच्याकडून महत्त्वाची माहिती करून घेतली होती. मंगळवारी पहिल्या दिवशी त्यांनी सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला तसेच त्यांच्याकडील कामांची माहिती घेतली. या वेळी प्रवीण तुपे यांना ‘आठवडय़ाचे मानकरी’  ठरवून त्यांचे कौतुक केले. ‘सारथी हेल्पलाइन’ तसेच बुधवारी मांडण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकाची माहिती त्यांनी घेतली. काही ठिकाणी पाहणी दौराही केला. दुपारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी आपली कार्यपद्धती स्पष्ट केली. वस्तुस्थिती मांडण्याचे व कोणत्याही परिस्थितीत दिशाभूल न करण्याचे आवाहन आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केले. प्रत्येकाने नेमून दिलेले काम व्यवस्थित केल्यास कारवाईची वेळ येत नाही. कोणावर कठोर कारवाई करायला आवडत नाही. त्यामुळे निलंबनासारखी कारवाई करण्याची वेळ तुम्हीही आणू नका. सकारात्मक पद्धतीने काम करा, त्यामुळे कामाचे चांगले परिणाम साधता येतात. आयुक्त सर्वेसर्वा नसतात, त्यांना अधिकाऱ्यांची साथ आवश्यक असते. आपल्याकडे येणाऱ्या नागरिकास किंमत द्या, त्याचे म्हणणे ऐकून घ्या. राजकीय व्यक्ती व्यवस्थेचा भाग असतात, त्यांना अव्हेरून चालणार नाही.