कौटुंबिक कलह, तणावपूर्ण जीवनशैली कारणीभूत

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आकर्षक पगार आणि पॅकेज असतानाही बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांमुळे अभियंत्यांकडून आत्महत्या करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. कौटुंबिक कलह, नैराश्य, बेरोजगारी, तणावपूर्ण जीवन, योग्य संवादाचा अभाव आदी कारणातून निर्माण झालेल्या परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात येते.

वाकड भागात आनंद यादव या अभियंत्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यादव यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता, त्यामुळे ते नैराश्यात होते आणि या नैराश्यातून ही आत्महत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. गेल्या काही दिवसात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांच्या आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. यापूर्वी, १७ मे २०१७ मध्ये रहाटणीत निनाद पाटील या अभियंत्याने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. २ एप्रिल २०१७ मध्ये पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या जीशन शेख या अभियंत्याने ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले होते. १७ मार्च २०१७ ला  दिघी येथे राजू तिवारी या अभियंत्याने विषप्राशन करून आत्महत्या केली होती. ३ फेब्रुवारी २०१७ ला हिंजवडीतील अभिषेक यादव या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. केवळ पिंपरी-चिंचवड शहरातच नव्हे तर पुण्यातही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.

आकर्षक पगार असतानाही नोकरी तसेच व्यवसायातील ताणतणाव, गृहकलह, बदलती जीवनशैली, कंपनीत कामाचे निर्धारित केलेले लक्ष्य (टार्गेट) आदी कारणांमुळे आयटी अभियंत्यांमध्ये कायम तणाव असल्याचे दिसून येते.

योग्य प्रकारे संवाद तसेच समुपदेशन न झाल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते, असे निरीक्षण पोलिसांकडून नोंदवण्यात येते. योग्य वेळी तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घेतल्यास कदाचित आत्महत्येची वेळ येणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

ताणतणावपूर्ण जीवनशैली असल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते, त्यासाठी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. अशावेळी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा असतो. योग्य वेळी संवाद साधणे व मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

– डॉ. किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञ