देशात काँग्रेस पक्ष कमजोर झाला असून या पक्षाला कॅल्शियमचे इनजंक्शन दिले, तरी काही उपयोग नाही. या पक्षात आता काहीच राहीले नाही. अशा शब्दात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले, तेव्हा पक्षाचे अध्यक्षांनी पदावरून बाजूले गेले. हे योग्य केले नसल्याचे सांगत राहुल गांधी यांचे नाव न घेता, ओवेसी यांनी टोला लगावला.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सभा पार पडली. त्यावेळी ओवेसी बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार हीना मोमीन, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीद शेख आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॅनियल लांडगे हे उपस्थित होते.

यावेळी ओवेसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे आता देशातील जनतेला एसआयएम हा पक्ष सक्षम पर्याय वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, देशात भाजपची सत्ता आल्यापासून मॉब लिचिंगच्या घटना घडत आहे. या घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या सर्व घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत जाऊन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रमप यांच्यासमोर आणि हजारो नागरिकांसमोर सांगतात. भारतात सर्व ठीक सुरू आहे असे बोलतात, आहो मोदी साहेब एवढ्या घटना होऊन देखील भारतात कस काय सर्व ठीक चालू असल्याचे सांगू शकता. अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

“आमच्यावर आजवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आले आहे. या माध्यमांतून आवाज दाबण्याचे काम केले आहे. आता आम्ही अशा शक्ति विरोधात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.  आजवर ज्या राजकीय पक्षांनी सत्ता भोगली, त्या सर्व पक्षांनी कधीच दलित समाजातील व्यक्तिला नेतृत्व करण्याची संधी दिली नाही.” पण आता आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणार आणि न्याय देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात भाजप 2014 पासून सत्तेत आहे. या भाजप कडून सर्व सामन्याच्या दृष्टीने कोणतेही निर्णय घेतले नाही. जे चुकीचे निर्णय घेतले. त्या विरोधात आवाज उठवल्यावर, आवाज दाबण्याचे काम या सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे. हे देशाच्या हिताच्या दृष्टीने नसून अशा कारभार करणार्‍या भाजपविरोधात समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.