‘अच्छे दिन’ आणण्याची स्वप्ने दाखवणाऱ्या राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारचा पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेसने गुरुवारी निषेध नोंदवला. शुक्रवारी २६ मे रोजी मोदी सरकारच्या सत्ता स्थापनेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘गाजर दिखाओ’ आंदोलन केले. सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजप सरकारने जनतेला मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली. मात्र, त्याची पूर्तता झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील नागरिकांना गाजरे वाटून भाजप सरकार तीन वर्षांत अपयशी ठरल्याची घोषणाबाजी केली. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने जनतेला गाजरे दाखवली, असे सांगण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला.

शहरातील शास्ती कराचा प्रश्न, अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत दिलेले आश्वासन आणि रेड झोनसंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे काँग्रेसने म्हटले. त्याच बरोबर राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहे. तर दुसरीकडे तूर खरेदीचा प्रश्न गंभीर असून भाजप सरकार यावर कोणतीही भूमिका घेत नसल्याचा आरोपही काँग्रेसने केला. आश्वासनाची पूर्तता केली नसल्यामुळे मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे मत काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यानी व्यक्त केले.

भाजपला सत्ता नव्हे तर समाज परिवर्तनासाठी काम करायचंय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस