भक्ती बिसुरे

मेलॅमाईन भेसळीमुळे ‘एफएसएसआय’चा निर्णय

मेलॅमाईन या पदार्थाचा वापर दुधात भेसळ करण्यासाठी होत असल्याने चिनी दुग्धपदार्थावरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणातर्फे (फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्डस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – एफएसएसआय) घेण्यात आला आहे. चॉकलेट्स आणि इतर दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन करताना मेलॅमाईनची भेसळ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे २००८ मध्ये चीनमधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थावर बंदीची घोषणा करण्यात आली होती. ही बंदी तीन महिने कालावधीसाठी लागू करण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी वाढवण्यात आली. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने चिनी पदार्थावर घातलेली बंदी डिसेंबर २०१८ मध्ये संपली असून त्याबाबत पुढील विचार विनिमय करण्यासाठी एफएसएसआयतर्फे बैठक घेण्यात आली.

या बैठकीत दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनात चीनमध्ये होणारा मेलॅमाईनचा वापर विचारात घेता ही बंदी कायम करण्यात आली आहे. मेलॅमाईनचा अंश तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने पदार्थाची तपासणी करणे शक्य नाही, त्यामुळे बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मेलॅमाईन हा घटक प्लास्टिक वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरला जातो. त्यातील नायट्रोजनचे प्रमाण मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याचा संभव असतो. त्यामुळे चिनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

मेलॅमाईन तपासणीची अद्ययावत सोय भारतातील प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध होईपर्यंत या पदार्थावरील बंदी न उठवण्याचे संकेत आहेत.

मेलॅमाईन का धोकादायक?

मेलॅमाईन हा रासायनिक घटक असून तो पांढऱ्या क्रिस्टल्सच्या रूपात आढळतो. मेलॅमाईनमध्ये नायट्रोजन मोठय़ा प्रमाणात आढळते. मुख्यत्वे प्लास्टिक वस्तूंच्या निर्मितीसाठी मेलॅमाईन वापरले जाते. पांढरे बोर्ड, गोंद सारखे घटक बनवण्यासाठी मेलॅमाईनचा वापर होतो. चीनमध्ये दुधात भेसळ करण्यासाठी मेलॅमाईनचा वापर केला जातो. त्यामुळे दुधातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते. या दुधाचा वापर इतर उत्पादनांच्या निर्मितीसाठी केला गेल्यास त्याचे दुष्परिणाम संभवतात. मेलॅमाईनयुक्त दुधाचा वापर करून बनवलेल्या गहू आणि तांदळाच्या ग्लुटेनचे दुष्परिणाम आढळून आले आहेत. अमेरिकेत पाळीव प्राण्यांच्या खाद्यामध्ये या मेलॅमाईनयुक्त दुधाचा वापर झाल्याने त्या खाद्याचे सेवन करणाऱ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.