नवी मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून शंभरपेक्षा अधिक करोना रुग्ण सापडू लागल्याने पालिका प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू करण्याचे ठरविले असून लग्न समारंभासाठी ५० जणांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. या नियमाचे पालन न झाल्यास ५० हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. नवी मुंबईत करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पन्नासपेक्षा कमी रुग्ण सापडत होते. मात्र आठवडाभरापासून यात वाढ झाली असून आता शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी तर १३० नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत याबाबत चर्चा केली असून नव्या करोनानिर्बंधाबाबतही चर्चा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी करोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देत प्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार सार्वजनिक व राजकीय कायक्रमांना ५० पेक्षा कमी उपस्थिती बंधनकारक केली आहे. सद्या शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर राजकीय कार्यक्रमांना गर्दी होत असून लग्न मूहूर्त असल्याने लग्नसमारंभांनाही गर्दी होत आहे. त्यामुळे शहरात लग्न व इतर समारंभाच्या कार्यक्रमासाठी भाडेतत्वावर देण्यात येणारे खुले लॉन्स, मंगल कार्यालये, सभागृहे, व इतर हॉल्स यामध्ये गर्दी होत असल्याने तेथे अंतर सोहळ्याचा नियम पाळला जात नाही. त्यामुळे लग्न व इतर समारंभाच्या कार्यक्रमांकरीता भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्याजागा व हॉल मालकांना तसेच कार्यक्रमांच्या आयोजकांना पालिकेने नवे आदेश काढले आहेत. लग्न व इतर समारंभात केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीच्या अटीवर जागा भाडेतत्वावर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ५० पेक्षा एकही व्यक्ती जास्त असल्याचे निदर्शनास आल्यास खुले लॉन्स, मंगल कार्यालये, सभागृहेव इतर हॉल्स यांच्या व्यवस्थापनांना ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच या नियमाचे वारंवार उल्लंघन केल्यास गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. अन्य सूचना प्रत्येक उपस्थितांचे थर्मल स्क्रीनिंगद्वारे शरीराचे तापमान मोजणे सॅनिटायझरची व्यवस्था करणे सामाजिक अंतराचे पालन करणे मुखपट्टीशिवाय एकाही व्यक्तीस प्रवेश न देणे