करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्य आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थानं ते करोना योद्धे आहेत. दरम्यान, त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलानं आज संपूर्ण देशभरात आकाशातून पुष्पवृष्टी करीत करोना योद्ध्यांचा सन्मान केला. पुण्यातही सैन्यदलांच्यावतीनं करोनाकाळात सतत कार्यरत असलेले जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा विशेष गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात सोशल डिस्टंसिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीय आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मेजर जनरल नवनीत कुमार म्हणाले, “पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला आहे. करोनाच्या लढाईत भारतीय सैन्य दल आपल्या सोबत आहे. या लढाईत करोना योद्ध्यांना बळ देणे आवश्यक आहे.”

सैन्य दलांच्यावतीने आयोजित या उप्रकमाबददल आभार व्यक्त करताना जिल्हाधिकारी म्हणाले, “पुणे जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून भारतीय सैन्य दल प्रशासनासोबत समन्वय ठेवून आहे. जिल्ह्यात पूरस्थिती किंवा संकट आले त्यावेळी भारतीय सैन्य दल कायम प्रशासनासोबतच राहिले. आजच्या करोना संसर्गाच्या स्थितीत प्रशासनाला पाठबळ देण्याचे काम भारतीय सैन्य दलाने केले. कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यामध्ये हिंमत देण्याची भारतीय सैन्य दलाची परंपरा असल्याचे सांगत करोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे, असं ते म्हणाले”