पुणे शहरात दिवसभरात ५२७ करोनाबाधित वाढले असुन, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ लाख ९६ हजार ९१६ झाली आहे. आजअखेर ४ हजार ८१६ रुग्णांचा मृत्यू झालेल आहे. दरम्यान आज २८० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजपर्यंत १ लाख ८९ हजार ७०१ जण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांचा आकडा वाढला आहे. शहरात आज दिवसभरात २८१ तर ग्रामीणभागातून शहरात उपचारासाठी आलेले २ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर, ३० जण करोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही मृत्यूची नोंद नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख २ हजार ६९८ वर पोहचली आहे. यापैकी, ९८ हजार १६५ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८७९ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – पुण्यात मास्क न घालता दुसऱ्यांदा आढळल्यास एक हजार रुपये दंड

राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील शहरांमध्येही करोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता अधिक कडक भूमिका घेतली जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार आता पुण्यात मास्क न घालता पहिल्यांदा आढळणाऱ्यास ५०० रुपचे दंड व तोच व्यक्ती पुन्हा जर मास्क न घालता आढळला तर त्याच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. कोविड -१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पारीत केलेले आदेश, निर्देश, एओपी इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सही, शिक्क्यानिशी परिपत्रक काढण्यात आलं आहे.

चिंताजनक – राज्यात २४ तासांत ४४ रुग्णांचा मृत्यू , ६ हजार ११२ करोनाबाधित वाढले

राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर करोनाबाधित वाढत असुन, करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांध्ये राज्यभरात ६ हजार ११२ नवे करोनाबाधित वाढले असुन, ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८७ हजार ६३२ वर पोहचली आहे. याशिवाय मागील २४ तासांमध्ये राज्यात २ हजार १५९ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत राज्यात १९ लाख ८९ हजार ९६३ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५. ३२ टक्के एवढे झाले आहे.