निधन झालेल्या व्यक्तीवर १६ तासांनी अंत्यसंस्कार पुणे : करोना प्रादुर्भावामुळे निधन झालेल्या व्यक्तीवर तब्बल १६ तासांनी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. महापालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदारपणाचा फटका बसलेल्या लेले कुटुंबीयांनी ‘अशी वेळ शत्रूवरही येऊ नये’ अशी संतप्त भावना व्यक्त केली आहे. ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ पदाधिकारी विलास लेले यांनाच हा अनुभव आला आहे. त्यांच्या वहिनींना रुग्णवाहिकेतून चार तास वणवण केल्यानंतर नामवंत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता करोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल १६ तासांनी म्हणजे ६ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या कारभारामुळे आम्हा कुटुंबीयांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला, अशी व्यथा लेले यांनी व्यक्त केली. वहिनींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी चार तास वणवण करावी लागली होती, तर मृत्यूनंतर अंत्यसंस्कारास सोळा तास ताटकळत राहावे लागले. त्यांचा मृत्यू दुपारी तीन वाजता झाला. रात्री आठ वाजता बिल झाले. एकदा बिल वसूल झाल्यावर रुग्णालयाचा संबंध संपतो. मग पार्थिव विशिष्ट बॅगमध्ये भरणे, रुग्णवाहिका आणि स्मशानभूमीची व्यवस्था आणि अंत्यविधी उरकणे हे सारे महापालिकेच्या लहरीनुसार होत असते. कोंढवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील हे ऐकल्यावर मनस्तापाची वेळ आली होती. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून सर्व घटना त्यांच्या कानावर घातली तेव्हा कैलास स्मशानभूमी येथील शीतगृहामध्ये सकाळपर्यंत पार्थिव ठेवण्यास परवानगी मिळाली . महापालिका, रुग्णवाहिका यंत्रणा आणि स्मशानभूमी यांच्यामध्ये समन्वय नाही. मृत व्यक्तीच्या नातलगांना रुग्णालय आणि महापालिकेकडून मदत तर दूरच, पण कोणतीही योग्य आणि समाधानकारक माहिती मिळत नाही, याकडे विलास लेले यांनी लक्ष वेधले. * शहरातील सर्व रुग्णालयांमधून अत्यावश्यक अशा पुरेशा व्यवस्था उपलब्ध कराव्यात. * कोणत्याही परिस्थितीत मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार चार तासात व्हायलाच पाहिजेत अशी व्यवस्था निर्माण करावी. * रुग्णाला १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका मिळायलाच हवी. * कोणत्या रुग्णालयामध्ये किती जागा आहेत याची माहिती प्रत्येक रुग्णालयामध्ये सामान्य जनतेस उपलब्ध व्हावी.