राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना सज्जड दम भरला असून हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. करोनासारख्या संकटकाळात काही खासगी रुग्णालयांकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर असून रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी असा आदेशही अजित पवार यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांनी यावेळी रुग्णालयांशी समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावा असा आदेशही दिला आहे. "करोनाचा प्रादुर्भाव टाळणे आणि अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी करोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाया नियमितपणे करुन शिस्त निर्माण करणं गरजेचं आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत," असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. Today, a review meeting to discuss Corona prevention measures was held in Jhumbar Hall of Vidanbhavan, Pune. At the meeting, directed that action should be taken against the negligent hospitals and Senior Officers should be appointed to co-ordinate with these hospitals. pic.twitter.com/SAj8adUnAM — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 6, 2020 "तसंच लॉॉकडाउनसंदर्भातील नियम, केंद्र आणि राज्य सरकारकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना, तसंच पुणे जिल्हा व शहरातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षेचं नियोजन करावं," असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणं, हे आपल्यासमोरचं आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणं आवश्यक आहे. याकामी नागरिकांनी शिस्त पाळणं आवश्यक आहे. — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 6, 2020 "उद्योगांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवन सुरळीत करणं गरजेचं आहे. सोबतच स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात येणं आणि यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं," अजित पवार यांनी सांगितलं आहे.