गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात निघालेले बांधकाम व्यावसायिक निखिल राणे यांना मारेकऱ्याने जिन्यात गाठले आणि मागून गोळी झाडून तो पसार झाला. त्याच्या खांद्यावर पिवळी शबनम पिशवी होती. २३ नोव्हेंबर २००९ रोजी ही घटना घडली. राणे खूनप्रकरणाचा तपास आधी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आला. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे विभागाने राणे खूनप्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, तरीही तपास न लागल्यामुळे पुढे राणे कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. हा तपास सीबीआयनेही केला. मात्र राणे यांच्या खुनाचा तपास सात वर्षांनंतरही अद्याप लागलेला नाही.

राणे कुटुंबीय मूळचे जळगावचे. निखिल राणे यांचे वडील पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील म्हणून ओळखले जायचे. वयोमानानुसार त्यांनी वकिली व्यवसायातून निवृत्ती घेतली. त्यांचा मुलगा निखिल बांधकाम व्यवसायात नावारुपाला आला. जंगली महाराज रस्त्यावरील अनंत चेंबर्समध्ये त्यांचे कार्यालय होते. ते २३ नोव्हेंबर २००९ रोजी कार्यालयात निघाले होते. अनंत चेंबर्समधील जिना अरुंद आहे. हा भाग कायम गजबजलेला असतो. अचानक जिन्यात फटाका फुटल्याचा आवाज झाला आणि निखिल जिन्यात कोसळले. पिवळी शबनम घेऊन उतरलेला तरुण जिन्यातून लगबगीत उतरला आणि कोणाला काही कळण्याच्या आत तो पसार झाला. इमारतीच्या खाली सुतारकाम करणाऱ्या एकाने तरुणाला पसार होताना पाहिले. गंभीर जखमी झालेल्या राणे यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पाठीत शिरलेल्या गोळीने अत्यवस्थ असलेल्या राणे यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याचे वृत्त शहरात पसरले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मारेकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. एकंदरीतच बांधकाम व्यावसायिकाचा खून ही तपासाच्या दृष्टीने सोपी गोष्ट नव्हती. अनेक कंगोरे उलगडल्यानंतर मारेकऱ्यापर्यंत पोहोचता येईल, हे पोलिसांना माहिती होते. त्यामुळे सुरुवातीला निखिल आणि त्यांचे बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवहार यांची पडताळणी करण्यात आली.

गुन्हे शाखेने तपास सुरु केल्यानंतर सूस रस्त्यावरील एका जमीन व्यवहारातील प्रकरणाची कुणकुण त्यांना लागली. या व्यवहारावरुन राणे यांचे एकाशी खटकले होते. खून करणारे सराईत असावेत तसेच गुन्हेगारी टोळीतील निष्णात नेमबाज (शूटर) असावेत, अशी शक्यता पोलिसांना वाटत होती. सूसमधील व्यवहारातील काही धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. त्यानुसार मुंबईतील कुख्यात अश्विन नाईक टोळीतील संदीप डिचोलकर आणि त्याच्या पुण्यातील साथीदारांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात पोलिसांना अपयश आल्याने न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. त्यानंतर निखिल राणे खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. सीआयडीचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. पी. एस. यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक माधव कर्वे, पोलीस अधिक्षक सुधाकर त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सैफन मुजावर, हवालदार यशवंत बधे, अमोल कोसगे, नाझरे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

हे प्रकरण तपासासाठी आल्यानंतर सीआयडीकडून या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दिवसरात्र तपास करण्यात आला होता. तत्कालीन उपअधीक्षक मुजावर तपासाबाबत माहिती देताना म्हणाले की, तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुन्हा घटनाक्रम उलगडण्यात आला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक किशोर जाधव, राम जाधव आणि सुनील पवार यांनी तपास केला होता. त्यांच्याकडून तपासाबाबत काही माहिती मिळाली. तपासाबाबतची दिशा निश्चित करण्यात आली. निखिल यांनी केलेले व्यवहार, त्यांचे भागीदार, व्यवहारातून झालेले वाद या गोष्टी पडताळून पाहण्यात आल्या. निखिल यांची पत्नी, आई, वडील, भाऊ यांची चौकशी करण्यात आली. निखिल यांनी खून होण्यापूर्वी पाच कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. ही बाब देखील पडताळण्यात आली. खासगी आयुष्यात त्यांचे कोणाशी वैमनस्य होते का, याची माहिती घेण्यात आली. खुनाच्या घटनेपूर्वी काही काळात निखिल यांनी मोबाईलवरुन तीन हजार कॉल केले होते. त्या प्रत्येक कॉलची सीआयडीकडून  पडताळणी करण्यात आली. त्यात जे काही संशयास्पद वाटले त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही.

खुनाची सुपारी गुंड टोळीला देण्यात आल्याची शक्यता पोलिसांना वाटत होती. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील गुंड टोळ्यांचे म्होरके आणि त्यांच्या साथीदारांकडे चौकशी करण्यात आली. मुंबईतील कारागृहात असलेल्या गुंड टोळ्यांमधील तसेच जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या शूटर्सकडेही चौकशी करण्यात आली. जवळपास शंभर ते सव्वाशे जणांची चौकशी करण्यात आली. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सीआयडीनेही दिवसरात्र तपास केला. मात्र, सीआयडी मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही.

निखिल राणे खून प्रकरणाच्या तपासावर त्यांच्या कुटुंबीयांचेही लक्ष होते. खासगी आयुष्यातील प्रत्येक बाब उलगडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या तपासात करण्यात आला. एवढेच नाही तर या प्रकरणात काही आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते, त्याचाही तपासात समावेश करण्यात आला होता. मुठा नदीपात्रात एक पिस्तूल सापडले होते. त्याचाही शोध घेण्यात आला होता. मात्र, त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याची माहिती मिळाली. शिवाजीनगर गावठाण भागातील गुंडाचा वर्गणीवरुन वाद झाला होता. त्याचीही चौकशी करण्यात आली होती. सीआयडीने खुनाचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, असेही मुजावर यांनी सांगितले. मुजावर सध्या भिवंडीत सहायक पोलीस आयुक्त आहेत.

त्यानंतर राणे कुटुंबीयांनी खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली. त्यानुसार हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. राणे कुटुंबीयांच्या मागणीवरुनच तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. हा तपास अद्यापही सुरु असला तरी खुनाचा माग काही लागलेला नाही.