आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्यानंतर सीबीआयने तावडे याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तावडे हाच दाभोलकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाचा: ‘वीरेंद्र तावडेचा अंनिसच्या कामाला पहिल्यापासून विरोधच होता’

डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणात तावडे याला १० जून रोजी सीबीआयने नवी मुंबई येथे अटक केली. त्यानंतर त्याला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तावडे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध सीबीआयने पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून तांत्रिक तपासावरदेखील भर देण्यात आला आहे. तावडे हा तीन मोबाइल संच वापरत होता. त्या माध्यमातून तो कोणाच्या संपर्कात होता या बाबीदेखील तांत्रिक तपासात पडताळण्यात येत आहेत. त्याच्याआधारे तावडे हाच दाभोलकर यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. दाभोलकर खून प्रकरणात झालेली ही पहिलीच अटक आहे. मात्र, या प्रकरणात आणखी दहा ते बारा जणांना अटक होण्याची शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, तावडे याला केवळ संशयावरून अटक करण्यात आली आहे. तावडे याची १ जूनपासून सीबीआयकडून चौकशी सुरू होती. त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे नाहीत, असा बचाव त्याचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी केला होता. मात्र, तावडे याच्याविरुद्ध आणखी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून सबळ पुराव्यांच्याआधारे तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध करण्यात येईल, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा: पानसरे हत्येबाबतही तावडेचा तपास होणार

तावडे हा हिंदू जनजागृती सभेचा कोल्हापूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी होता. २००४ मध्ये त्याने कोल्हापूर येथे जाहीर भाषणात डॉ. दाभोलकर यांना धमकीही दिली होती. गोव्यातील मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणात सनातनचा साधक सारंग अकोलकर याचा हात होता. हा स्फोट घडविण्यापूर्वी तावडे आणि अकोलकर हे एकमेकांशी ई-मेलद्वारे संपर्क साधत होते. डॉ. दाभोलकर, तसेच बंगळुरू येथील ज्येष्ठ कन्नड लेखक-विचारवंत एम. एम. कलबुर्गी आणि कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात साम्य आहे.