टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमध्ये एकूण ६.२० टीएमसी पाणी

पुणे : शहरात अद्याप दमदार पाऊस झालेला नसला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत एक महिना पुरेल एवढा पाऊस झाला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. शहराला प्रतिमहा एक ते १.२५ टीएमसी पाणी लागते.

शहर आणि परिसराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून पाणीपुरवठा के ला जातो. गेल्या दोन दिवसांमध्ये या चारही धरणांमध्ये एक अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे या चारही धरणांमध्ये मिळून एकू ण ६.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाणीपातळी वाढू लागली आहे. मंगळवारी दिवसभरात पानशेत धरण परिसरात ६३ मिलिमीटर, टेमघर धरण क्षेत्रात ५८ मि.मी., वरसगाव धरण क्षेत्रात ५७ मि.मी. आणि खडकवासला धरण परिसरात २५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. या चारही धरणांमध्ये दोन दिवसांपूर्वी ५.२५ टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, दोन दिवस संततधार सुरू असल्याने पाणीसाठा ६.२० टीएमसीवर गेला आहे. सध्या सर्वाधिक पाणीसाठा पानशेत धरणामध्ये २.६८ टीएमसी आहे. त्यानंतर वरसगाव धरणात २.३० टीएमसी, खडकवासला धरणामध्ये ०.९६ टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरणाची दुरुस्ती करण्यात येत असली, तरी यंदा या धरणात पाणी साठवण्यात येणार आहे. या धरणात सध्या ०.२६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण भरू लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने खडकवासला धरणात पुणेकरांना पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.

अन्य धरणांच्या क्षेत्रात तुलनेने कमी पाऊस

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात तुलनेने कमी पाऊस पडत आहे. गुंजवणी धरण परिसरात मात्र आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडला आहे. मंगळवारी दिवसभरात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल वडिवळे धरण परिसरात ७४ मि.मी. पाऊस पडला, तर अन्य धरणांपैकी वीर, घोड, विसापूर आणि उजनी धरणांच्या परिसरात तुरळक पावसाची नोंद होत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.