वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेच्या (एमएचटी-सीईटी) आयोजनासाठी सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त पाहणी करत आहेत. पुढील सात-आठ दिवसांत अहवाल सादर झाल्यानंतर प्रवेश परीक्षेचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.

तसेच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्याचेही संकेत सामंत यांनी दिले.

शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या पाहणीनंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंतिम वर्ष परीक्षा, शुल्क, सीईटी अशा विविध विषयांवर सामंत यांनी भाष्य केले. अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सामंत म्हणाले, की राज्य शासनाने अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. करोना संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांना धोक्यात आणून परीक्षा न घेण्याची शासनाची भूमिका आहे. परीक्षा न घेण्याचा उल्लेख शासन निर्णयात नाही. गुणांकन सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते.

राज्यातील पाच-साडेपाच लाख विद्यार्थी सीईटी देत असल्याने ही परीक्षा तालुका, जिल्हास्तरावर घेण्यासाठी सीईटी सेलकडून पाहणी सुरू आहे. काही शाळा, महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. तसेच परीक्षेसाठी संगणक व्यवस्था, अन्य यंत्रणा, पायाभूत सुविधा सक्षम आहे का हे तपासण्यात येत आहे. आणीबाणीची परिस्थिती आल्यास बारावीच्या गुणांवरच प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा विचार होऊ शकतो. मात्र अनेक विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण अधिक महत्त्वाचे वाटतात. या सगळ्याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

औषधनिर्मिती विद्यापीठ औरंगाबादमध्ये प्रस्तावित

औषधनिर्मितीशास्त्राचे स्वतंत्र विद्यापीठ औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. या विद्यापीठासाठी २५ ते ३० एकर जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यही केले आहे. या विद्यापीठामुळे रोजगार निर्मितीही होऊ शकणार आहे. या प्रस्तावासह राज्याकडून केंद्राकडे गेलेल्या प्रस्तावांच्या पाठपुराव्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

शुल्काबाबत लवकरच निर्णय

करोनाच्या काळात महाविद्यालये बंद असल्याने व्यायामशाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालये बंद आहेत. महाविद्यालयांचा वीज, देखभाल दुरुस्ती खर्चही होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शुल्क कमी करण्याची होत असलेली मागणी रास्त आहे. या संदर्भात शासनस्तरावर विचार सुरू आहे. लवकरच या बाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच अंतिम वर्षांच्या परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत द्यायचे, की पुढच्या वर्षांचे शुल्क म्हणून ग्राह्य़ धरायचे या बाबतही निर्देश दिले जातील, असे सामंत यांनी नमूद केले.

विद्यापीठाच्या कुलगुरूंसह सर्वात जास्त बैठका

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री झाल्यापासून प्रत्येकवेळी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली आहे. परीक्षांबाबतही कु लगुरूंशी चर्चा करूनच निर्णय घेतला. काही लोक खोटे बोलून गैरसमज पसरवत आहेत. गेल्या पाच वर्षांत झाल्या नाहीत एवढय़ा बैठका मी कुलगुरूंसह मंत्री झाल्यापासून घेतल्या आहेत, असे सामंत म्हणाले.