दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतील चित्र पुणे : केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत देशभरातील ग्रामीण भागातील तरुणांना मिळणारे प्रशिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये (प्लेसमेंट) करोनाकाळात मोठी घट झाली आहे. योजनेअंतर्गत २०१९-२०मध्ये २ लाख ४५ हजार ९९७ तरुणांना प्रशिक्षण आणि १ लाख ५० हजार ८५ तरुणांना नोकरी मिळाली होती, तर २०२०-२१मध्ये केवळ ३२ हजार ४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आणि केवळ ४९ हजार ४७१ जणांना नोकरी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाद्वारे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना देशपातळीवर राबवली जाते. या योजनेअंतर्गत तरुणांना दिले जाणारे प्रशिक्षण, नोकरी या संदर्भातील आकडेवारी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मार्च २०२३ पर्यंत २८ लाख ८९ हजार ८२३ तरुणांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असताना २०१४-१५ पासून आतापर्यंत (२३ जून) ११ लाख १३ हजार ६३९ तरुणांचे प्रशिक्षण झाले आहे, तर त्यापैकी ६ लाख ५० हजार ५०४ तरुणांना नोकरी मिळाली आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्यांच्या तुलनेत नोकरी मिळण्याचे प्रमाण सुमारे ६० टक्के च असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. योजनेमध्ये देशभरातील २ हजार २८७ केंद्रांद्वारे ३२९ शाखांमधील प्रशिक्षण देण्यात येते. योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून २०१६-१७मध्ये प्रशिक्षण आणि नोकरी मिळालेल्यांची संख्या सर्वाधिक होती. त्या वर्षी ३ लाख ४९ हजार १५५ तरुणांचे प्रशिक्षण झाले, तर १ लाख ८५ हजार ४५ तरुणांना नोकरी मिळाली. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून २०२०-२१मध्ये ३२ हजार ४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले, तर ४९ हजार ४७१ तरुणांना नोकरी मिळाली आहे. २०२१-२२मध्ये आतापर्यंत १ हजार ७९२ तरुणांचे प्रशिक्षण झाले आहे, तर ८ हजार ९७५ तरुणांना नोकरी मिळाल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राज्यात २६ हजारहून अधिक तरुणांना नोकरी देशभरातील राज्यांमध्ये सर्वाधिक प्रशिक्षण आणि नोकरी मिळालेल्या तरुणांमध्ये ओडिशा आघाडीवर आहे. ओडिशातील १ लाख ८३ हजार ३८२ तरुणांचे प्रशिक्षण झाले आहे, तर १ लाख ३५ हजार ९२९ तरुणांना नोकरी मिळाली आहे. तर महाराष्ट्रातील ८० हजार ७५५ तरुणांना प्रशिक्षण आणि नोकरीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ४४ हजार १२१ तरुणांचे प्रशिक्षण झाले आहे, तर २६ हजार ७३९ तरुणांना नोकरी मिळाली आहे. राज्यात २०२०-२१मध्ये ५०८ तरुणांना प्रशिक्षण मिळाले, तर ३ हजार २७६ तरुणांना नोकरी मिळाली. २०२१-२२मध्ये आतापर्यंत तरुणांचे प्रशिक्षणच झाले नसून ५०१ जणांना नोकरी मिळाल्याचे संके तस्थळावर नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे करोनाकाळात राज्यातील ३ हजार ३७७ तरुणांना नोकरी मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.