वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई ‘महावितरण’ कडून तीव्र करण्यात आली असून, या कारवाईत मागील १२ दिवसांमध्ये २९ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. मोहिमेमध्ये ६७,८०७ ग्राहकांनी २० कोटी १९ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला.
थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात पुणे, िपपरी-चिंचवड, मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागात कारवाई करण्यात येत आहे. वीजबिलांची वसुली करण्याबरोबरच थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्यात येत आहे. गेल्या बारा दिवसांमध्ये ९ कोटी ९५ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील २९ हजार ७७२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील एक कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या ३१६५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी, तर आठ कोटी ११ लाखांच्या थकबाकीपोटी २६ हजार ६०७ वीजग्राहकांचा वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.
मोहिमेमध्ये ६७, ८०७ थकबाकीदार वीजग्राहकांनी २० कोटी १९ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यात ५६, ९३५ घरगुती ग्राहकांनी १३ कोटी ४० लाख रुपये, ९०५१ वाणिज्यिक ग्राहकांनी दोन कोटी ८४ लाख रुपये, तर १८२१ औद्योगिक ग्राहकांनी तीन कोटी ९६ लाख रुपयांचा भरणा केला.