वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी देहू येथील बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यावर जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी बंडातात्या यांनी संयमी भूमिका घ्यावी असं आवाहन केलं आहे. तसेच शांततेला गालबोट लागेल असं काही करू नये असंही माणिक महाराज मोरे यांनी म्हटलं आहे. तात्या वारकरी संप्रदायचे आधारस्तंभ असून त्यांनी व्यापक विचार विचारात घ्यावा असं देखील माणिक महाराज यांनी म्हटलंय. "यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे," असं बंडातात्या कराडकर यांनी रविवारी सातारा येथे म्हटलं होतं. त्यानंतर वारकाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था झाली होती. मात्र, यावर देहू संस्थान ने स्पष्टीकरण दिले असून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच सोहळा साजरा केला जाईल अस म्हटलं आहे. यावेळी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी बंडातात्या कराडकर यांना संयम राखण्याचं आवाहन केलं. "बंडातात्यांनी संयमी भूमिका घ्यावी, शांततेला गालबोट लागेल अस करू नये. देहूत दरवर्षी लाखो वारकरी बिजोत्सव सोहळ्यासाठी दाखल होतात. शासनाने लागू केलेल्या नियमांप्रमाणेच सोहळा साजरा करण्यात येईल. नियम झुगारून जर सोहळा साजरा केला तर वारकरी संप्रदाय बाधित होईल. संयम दाखवून, शासनाचा नियम हा सोहळा होईल. बिजोत्सव सोहळा देखील वारकरी आणि नागरिकांनी घरी बसून साजरा करावा, असं आवाहन माणिक महाराज मोरे यांनी वारकरी आणि नागरिकांना केले आहे. पुढे ते म्हणाले की, "तात्या हे वारकरी संप्रदायचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. त्यांनी वारकरी संप्रदायची सेवा केली आहे. त्यांनी व्यापक विचार विचारात घ्यावा. या अगोदर शासनाचे नियम पाळले आहेत. एवढीच यात्रा राहिलेली आहे, ती शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच होईल," बिजोत्सवाला शासनाने घालून दिलेल्या नियमांना सहकार्य करावं असं त्यांनी म्हटलं आहे. ५० वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडणार आहे करोना महामारीमुळे संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा ५० भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि देहूगाव येथील देहूसंस्थांनचे पदाधिकारी यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी लाखो च्या संख्येने भाविक देहूत दाखल होतात, सध्या कोरोनाची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ५० भाविकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये बीज सोहळा पार पडणार आहे.