पुण्यात आकुर्डी परिसरामध्ये आज डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचा उद्घाटन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये तरुणांच्या कौशल्याविषयी आणि नवीन काहीतरी करण्याच्या इच्छाशक्तीविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविषयी आश्चर्य व्यक्त करतानाच काँग्रेसला टोला लगावला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

तरुणांना त्यांच्या कल्पना राबवण्याची संधी दिली गेली पाहिजे, हे सांगताना त्यांनी राज्यमंत्री सतेज पाटील यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “आम्ही महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून कामं करत असतो. मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे काम करतात. नेहमी चर्चा करताना त्यांच्यात नवीन काहीतरी करण्याची कल्पना, धाडस असते. मला अजूनही सतेज पाटील यांचं कळत नाही. सतेज पाटलांनी मला सांगितलं की ते पन्नाशीला पोहोचले. आता पन्नाशीला पोहोचले तरी काँग्रेस अजून राज्यमंत्रीच ठेवतेय, हे मला काही कळत नाही”.

“मला कसलीही कारणं सांगू नका, माझ्या गतीनं कामं करा”; अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं

राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्याच्या अधिकारांत फरक

“नवीन पीढीला पुढे आणण्यासाठी पवार साहेबांनी जसं मला, जयंत पाटलांना ३८, ४० वय असताना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. त्यामुळे आम्हाला वाटायचं की आपल्याकडून चांगल्यात चांगलं घडलं पाहिजे. तेव्हा आम्ही हिरीरीने काम करण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारांत जमीन-आस्मानाचा फरक आहे. एखाद्या राज्यमंत्र्याने कितीही मनात आणलं, तरी त्याला कॅबिनेट मंत्री पाठिंबा देत नाही, तोपर्यंत त्यांना अनेक अडचणी येत असतात”, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.