पर्यटन क्षेत्रातील आर्थिक संधी, वनांतील स्थानिकांचा उदरनिर्वाह, निसर्ग पर्यटनाला चालना व त्या माध्यमातून स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती यांचा विचार करून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने राज्यातील तीनशे वीस निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासाचा आराखाडा तयार केला आहे. निसर्ग पर्यटनाची संकल्पना वन विभागातर्फे यापुढे व्यापक प्रमाणात राबविली जाणार असल्याची माहिती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील लिमये आणि विभागीय वन अधिकारी किशोर मिश्रीकोटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. लिमये म्हणाले, महाराष्ट्रामध्ये संरक्षित वनक्षेत्र मोठे असून पर्यटक त्यांना नियमितपणे भेट देत असतात. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने वन विभागाने तीनशे वीस स्थळे निश्चित केली आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास करणे, तेथे वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे, निवास आदीची सोय, भोजन या पायाभूत सुविधांची पूर्तता पर्यटन स्थळांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून येत्या पाच वर्षांत पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. मिश्रीकोटकर म्हणाले, राज्यातील निवडण्यात आलेल्या स्थळांमध्ये धार्मिक, ऐतिहासिक, देवराई, अभयारण्ये, किल्ले, थंड हवेची ठिकाणे अशा वैविध्यपूर्ण स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटकांना तेथे जाऊन निसर्गाच्या सहवासात राहण्याचा आनंद मिळविता येणार आहे. राज्यातील विविध पर्यटनस्थळांचे महत्त्व लोकांना या माध्यमातून कळणार आहे. या पाश्र्वभूमीवर पर्यटन विकास मंडळातर्फे पाचवी ते नववीच्या जिल्हा परिषद व आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांसाठी निसर्ग अनुभव या एक दिवसीय निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील भिन्न क्षेत्राचे वनाधिकारी, तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने निसर्ग पर्यटन स्थळांबाबत व त्यांच्या विकासाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुणे विभागातील स्थळांचा समावेश पुण्याची नैसर्गिक परिसंस्था, ऐतिहासिक, धार्मिक, पाश्र्वभूमी लक्षात घेता पुणे जिल्ह्य़ातील ३४ पर्यटन स्थळांचा समावेश या आराखडय़ात करण्यात आला आहे. त्यात ताम्हिणी घाट, रायरेश्वर, शिवनेरी, हरिश्चंद्र गड, जेजुरी खंडोबा देवस्थान, अहुपे देवराई, वारजे वन उद्यान, उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान आदी पर्यटकांना परिचित - अपरिचित अशा ३४ पर्यटन स्थळांचा समावेश आहे. जैवविविधतेला हानी न पोहोचता पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.