महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बाला रफिक शेखला चितपट करत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाजी मारली आहे. गतवर्षी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत बाला रफिक शेख हा विजयी ठरला होता. यावर्षीही त्याचं वर्चस्व या स्पर्धेवर असेल असं वाटत होतं अशातच सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला आस्मान दाखवलं आहे आणि उपांत्य फेरीत त्याचा पराभव केला आहे. अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये ज्ञानेश्वर जमदाडेने बाला रफिक शेखला चितपट केलं आहे. बाला रफिक शेख हरल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे. बाला रफिख शेख हरल्याची बातमी समोर येत असतानच अभिजित कटके हा देखील उपांत्य फेरीत हरला आहे. त्यामुळे अभिजित कटके आणि बाला रफिक शेख हे दोन्ही मल्ल स्पर्धेबाहेर गेले आहेत. मॅट विभागाच्या अंतिम फेरीत अभिजित कटकेला नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या मल्लाकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. सलग चौथ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब मिळवायचा असा निश्चय करुन मॅटवर उतरलेल्या अभिजित कटकेला हर्षवर्धनने ५-२ अशा फरकाने हरवून थरारक विजय आपल्या नावावर नोंदवला आहे. हर्षवर्धन सदगीर हा अर्जुनवीर काका पवारांचा चेला आहे. पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात तो सराव करत होता. अभिजित कटके आणि बाला रफिक शेख हे दोन्ही मल्ल महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाहेर गेले आहेत त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा यंदा नवा पैलवान उचलणार यात शंकाच नाही. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेची माती विभागात निवड झाली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी चिकमहूद येथील सुशील कुमार शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभाग आणि गादी विभाग व कुमार निवड चाचणीत अनेक नामवंत मल्लांनी त्यांचा खेळ आजमवला. या स्पर्धेतील माती विभागात अव्वल ठरला तो ज्ञानेश्वर जमदाडे. त्यामुळेच त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली. ही निवड त्याने सार्थ ठरवली आहे असंच दिसतं आहे कारण त्याने गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी असलेल्या बाला रफिक शेखला उपांत्य फेरीत आस्मान दाखवलं आहे.