साहित्य अकादमीची निर्मिती; अनिल झणकर यांचे दिग्दर्शन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ..लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांपासून ते संशोधकांशी संवाद साधणारे विज्ञान प्रसारक.. ‘आयुका’ ही संस्था साकारणारे आणि महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या कार्यामध्ये रस घेणारे द्रष्टे नेतृत्व.. कथा आणि कादंबरीच्या माध्यमातून विज्ञान समाजाभिमुख करणारे साहित्यिक.. कुटुंबवत्सल पिता आणि नातवंडांचे लाडके आजोबा.. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एक तासाच्या लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या लघुपटासाठी अनिल झणकर यांनी दिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर गुरुवारी (१९ जुलै) वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत. विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केलेल्या नारळीकर यांच्यावरील लघुपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी साहित्य अकादमीने माझ्यावर सोपविली याचा आनंद वाटतो, असे अनिल झणकर यांनी सांगितले. डॉ. नारळीकर यांच्या मुलाखतीसह त्यांच्यासमवेत काम केलेले डॉ. नरेश दधिच, डॉ. अजित केंभावी आणि डॉ. सोमक राय चौधरी हे संशोधक, ज्येष्ठ गणिती डॉ. मंगला नारळीकर, डॉ. शरद देशपांडे, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांची मनोगते लघुपटामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. विज्ञानकथा, कादंबरीलेखनासह विज्ञान समाजाभिमुख करण्यासाठी नारळीकर यांनी आकाशवाणी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिलेली व्याख्याने, या साऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकताना नारळीकर यांचे साहित्यिक म्हणून असलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला आहे, असे झणकर यांनी सांगितले. दोन खंडांत समग्र नारळीकर डॉ. जयंत नारळीकर यांच्या ८० व्या वर्षपूर्ती वाढदिवसाचे औचित्य साधून राजहंस प्रकाशनतर्फे दोन खंडांमध्ये ‘समग्र नारळीकर’ प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या खंडात नारळीकर यांच्या ‘अंतराळातील स्फोट’, ‘वामन परत न आला’, ‘व्हायरस’, ‘अभयारण्य’ आणि ‘प्रेषित’ या पाच कादंबऱ्यांचा समावेश आहे. या कादंबऱ्यांमध्ये कोणती वैज्ञानिक तत्त्वे आली आहेत त्याचे विवेचन आणि ललित विज्ञान लेखन या विषयावर नारळीकर यांचा प्रस्तावनापर लेख असेल. तर, दुसऱ्या खंडामध्ये नारळीकर यांच्या कथांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे यांनी दिली.