‘रहिवासी दाखला हवा आहे? काही तासात मिळेल. रेट वीस हजार.!’ रहिवासी दाखला काढण्यासाठी जाणाऱ्या अनेकांना शिवाजीनगर गोदाम परिसरामध्ये अशा ‘ऑफर्स’ ऐकू येत आहेत. प्रवेश परीक्षेच्या तोंडावर रहिवासी दाखला मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थी हवालदिल असताना हे दाखले मिळवून देणाऱ्या दलालांचा सध्या सुळसुळाट झाला आहे.रहिवासी दाखला मिळवण्यासाठी अनेक वेळा खेपा घालाव्या लागल्यानंतर किंवा तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर गर्दीतून अचानक कुणीतरी जवळ येते आणि ‘रहिवासी दाखला ना. काही तासात मिळेल. कागदपत्रं द्या. दुपापर्यंत दाखला मिळून जाईल. वीस हजार रूपये लागतील.’ अशा स्वरूपाची ऑफर समोर ठेवली जाते. त्याकडे दुर्लक्ष करून हळूहळू सरकणाऱ्या रांगेतून खिडकीजवळ पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष दाखला हातात मिळण्यासाठी आठ दिवस लागतील असे उत्तर मिळते आणि नकळतपणे पावले ऑफर्स घेऊन फिरणाऱ्या माणसाकडे वळतात. त्याच्याशी बोलल्यानंतर अर्धे पैसे आधी आणि अर्धे दाखला मिळाल्यानंतर असा व्यवहार ठरतो.. शिवाजीनगर गोदामात बुधवारी व गुरुवारीसुद्धा हेच चित्र पाहायला मिळाले.अशा प्रकारे ऑफर्स घेऊन फिरणाऱ्या दलालांचा शिवाजीनगर गोदामामध्ये सध्या सुळसुळाट झाला आहे. रहिवासी दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट घेण्यासाठी २० ते ३० हजार रुपये दलाल मागत आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापन या शाखांबरोबरच महाविद्यालयांचीही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी सध्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. मनुष्यबळ पुरेसे नसल्यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. कागदपत्रे दिल्यानंतर दाखला मिळण्यासाठी आठ दिवस लागतील, असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिले जात असताना दलालांकरवी काही तासांमध्ये दाखला हातात कसा मिळतो, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.याबाबत एका पालकाने सांगितले, ‘‘अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सर्व कागदपत्रे देण्यासाठी शनिवारी शेवटची मुदत आहे. मात्र, त्यापूर्वी रहिवासी दाखला मिळू शकत नसल्यामुळे मुलाला प्रवेश कसा मिळणार अशी चिंता आहे. १९ तारखेला रहिवासी दाखला मिळेल, असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. मात्र, दलालांनी एका दिवसात रहिवासी दाखला मिळवून देण्यासाठी २० हजार रुपये मागितले.’’