भारतीय कलांमधून आत्मशांतीची प्रचिती येते. सध्याच्या धावपळीच्या जगात आत्मानंद मिळवायचा असेल, तर भारतीय कलांना पर्याय नाही, असे मत संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. गानवर्धन संस्थेतर्फे शिलेदार यांच्या हस्ते ज्येष्ठ कथक नृत्यांगना जयश्री जंगम यांना डॉ. विजया भालेराव कथक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, लता साठे आणि भालेराव यांचे पुत्र अभय भालेराव या वेळी उपस्थित होते. कीर्ती शिलेदार म्हणाल्या,की कलांची श्रीमंती वृद्धिंगत व्हावी यासाठी असे पुरस्कार दिले गेले पाहिजेत. त्याने कलाकारांनाही चांगले काम करण्यास हुरुप येतो. सध्या आत्मकेंद्री वृत्ती बळावत असताना निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या कलाकारांचे कौतुक करणे गरजेचे आहे. कलाक्षेत्रात मी खारीचा वाटा उचलला. त्याचे कौतुक झाले याचा आनंद झाला असून आई-वडील आणि गुरुजन यांनी केलेले संस्कार आणि माझ्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याची भावना जयश्री जंगम यांनी व्यक्त केली. प्रियांका भडसावळे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात ‘विविध रंग कानडा’चे या कार्यक्रमात श्रीनिधी गोडबोले, मंदार गाडगीळ, तेजश्री पिटके, गायत्री जोशी यांनी ‘कानडा’ रागातील रचनांचे गायन केले. त्यांना प्रवीण कासलीकर यांनी संवादिनीची, गणेश चौधरी यांनी तबल्याची साथसंगत केली. कार्यक्रमाची संकल्पना डॉ. नीलिमा राडकर यांची होती.