३१ डिसेंबर, २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात एनआयएनं आणखी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी पुण्यातील कबीर कला मंचचे कलाकार आहेत. दोघांचे माओवादी संघटनेशी संबध असल्याचा आरोप असून, एल्गार परिषद आयोजित करण्यात आलेल्या समितीचे सक्रिय सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सागर गोरखे,रमेश गायचोर व ज्योती जगताप अशी त्यांची नावं आहेत.

पुण्यात २०१७ मध्ये शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहेत. सध्या प्रकरणात त्यावेळी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज एनआयएनं आणखी तिघांना पुण्यात अटक केली आहे.

कबीर कला मंचशी संबधित असलेल्या सागर गोरखे आणि रमेश गायजोर यांना एनआयएनं अटक केली आहे. ज्या समितीनं एल्गार परिषद आयोजित केली होती, त्या भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान समितीचे हे दोघे त्यावेळी सक्रिय सदस्य होते. आणखी दोन दोघांना अटक केल्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या १४ झाली आहे. यात अटक झालेले अनेकजण मानवी हक्क कार्यकर्ते, प्राध्यापक आणि वकील आहेत. जुलैमध्ये एनआयएनं दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू एम. टी यांना अटक केली होती. त्यानंतर एनआयएनं गोरखे आणि गायचोर यांच्यासह अनेकांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं.

मागील काही दिवसांपासून गोरखे आणि गायचोर यांना एनआयएकडून मुंबईला चौकशीसाठी बोलवलं जात होतं. त्यानंतर सोमवारी (८ सप्टेंबर) त्यांना अटक करण्यात आली,’ अशी माहिती आरोपींचे वकील मिहीर देसाई यांनी सांगितलं.

पुण्यात ३१ डिसेंबर, २०१७ रोजी शनिवार वाड्यावर ‘एल्गार परिषद’ झाली. दुसऱ्याच दिवशी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा परिसरात हिंसाचार झाला. पुढे ‘एल्गार परिषद’ संबंधित दाखल गुन्ह्यात पुणे शहर पोलिसांनी देशभरातून नऊ लोकांना अटक केली व एकूण २३ जणांना आरोपी केले होते. यात गोरखे आणि गायचोर यांचीही नावं होती. हे सर्व आरोपी प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार माओवाद्यांचे पैसे वापरून एल्गार परिषद आयोजित केल्याचाही आरोपही पोलिसांनी केला होता.