मेट्रो कारशेड बीकेसी अर्थात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या बुलेट ट्रेनच्या जागेवर स्थानांतरित करण्याची चाचपणी ठाकरे सरकारने सुरु केली आहे. याबाबत आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणतात, “बुलेट ट्रेन पूर्णतः भूमिगत म्हणजेच अंडरग्राऊंड स्वरुपाचा प्रकल्प आहे. जमिनीच्या तीन लेव्हल तो खाली आहे. जमिनीवरची फक्त ५०० मीटर जागा बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणार आहे. समजा या कारशेडसाठी तितकी जमिन उपलब्ध नसेल आणि त्यामुळे ते भूमिगत करायचे ठरविले, तर ५०० कोटींची बांधकामाची किंमत ५ हजार कोटी रूपयांवर जाईल. शिवाय भूमिगत कारशेडच्या देखभालीचा खर्च हा जमिनीवरील कारशेडच्या देखभालीपेक्षा पाच पट अधिक असतो. त्यामुळे हा पर्याय ववापरल्यास मेट्रो प्रकल्प कायमस्वरूपी अव्यवहार्य ठरेल. त्यामुळे असे सल्ले जे कुणी देत आहेत, ते संपूर्ण राज्याला आणि सरकारला बुडविण्याचे सल्ले देत आहेत.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले आहेत फडणवीस?

“मोकळ्या जागेचा विचार करायचा झाला, तर एकत्रित २५ हेक्टर जागा एका ठिकाणी उपलब्ध नाही आणि समजा उपलब्ध झालीच तर एमएमआरडीएच्या शेवटच्या व्यवहाराचा दर लक्षात घेता या जागेसाठी २० हजार कोटी रूपये लागतील. (अगदी अलिकडच्या काळातील व्यवहार तपासला तर एमएमआरडीएने सुमिटोमोला दिलेली जागा. ती १८०० कोटी रूपये प्रति हेक्टर या दराने दिली आहे.)

मेट्रो कारशेडबाबत कांजूरमार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समजली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता सरकारला ज्या कुणी हा सल्ला दिला आहे तो योग्य नाही. राज्याला आणि सरकारला बुडवण्याचा हा सल्ला आहे असं त्यांनी म्हटलं आहे.