आगामी काळात पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाबत आज(रविवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा संदर्भात एक भाकीत केलं आहे. त्यांच्या या भाकीताची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात माध्यमांनी प्रश्न विचारला असता, फडणवीसांनी देखील आपल्या शैलीत टोला लगावाल्याचे दिसून आले. आसाम वगळता अन्य राज्यात भाजपाचा पराभव होईल, असं शरद पवार म्हणाले होते.

यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “लोकसभा निवडणुकीपूर्वी असं भाकीत अनेक नेते करत होते की, भाजपाला केवळ १८० जागा मिळतील. पण अगोदरपेक्षा जास्त जागा भाजपाला मिळाल्या, या निवडणुकांमध्येही भाजपा हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून आपल्या समोर येईल हा मला विश्वास आहे.”

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भाजपाची सत्ता राहील, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवलं आहे.

हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट -शरद पवार

“आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल. हा ट्रेंड असून, हा पाच राज्यांचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल. पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल,” असा विश्वार पवार यांनी व्यक्त केला आहे.