पावसाचे पाणी साचल्याने घाऊक बाजारात सर्वत्र चिखल; माल खराब होण्याचे प्रमाण वाढले मार्केट यार्डातील फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे या विभागात मोठय़ा प्रमाणावर चिखल होत आहे. शेतीमाल चिखलात ठेवण्यात असल्याने माल खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतीमालाला कमी दर मिळत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मार्केट यार्डातील नालेसफाईचा दावा करण्यात आला असला तरी पावसामुळे तो फोल ठरला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या दोन वर्षांपासून नालेसफाई झाली नव्हती. यंदा पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात आल्याचे बाजार समितीकडून करण्यात आला होता. गेल्या आठवडय़ात पाऊस सुरू झाल्यानंतर बाजार समितीचा दावा फोल ठरला आहे. पावसाचे पाणी गाळ्यांसमोर साचत आहे. सांडपाण्याची गटारे तुंबून त्याचे पाणी गाळ्यासमोर येत आहे. त्यामुळे बाजारआवारात गाळ्यासमोर ठेवण्यात आलेला शेतीमाल खराब होतो. पावसात भिजलेल्या शेतीमालाची प्रतवारी कमी होते. त्यामुळे शेतक ऱ्यांना अपेक्षाएवढा दर मिळत नाही. शेतीमाल खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतक ऱ्यांबरोबरच आडत्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रार करण्यात आली. बाजार आवारातील काही गाळ्यांसमोर कठडे बांधण्यात आले होते. कठडय़ावर साचलेले पाणी गाळ्यांसमोर पडते. त्यामुळे चिखल होतो. गेल्या वर्षी बाजार समितीकडून बाजारआवारात गाळ्यांसमोर बांधण्यात आलेले अनधिकृत कठडे पाडण्यात आले होते. मात्र, काही गाळ्यांवरील कठडे तसेच आहेत. चिखलात शेतीमाल पडल्यामुळे खरेदीदार खराब प्रतीचा माल खरेदी करत नाहीत. चिखलातून खरेदीदारांना जावे लागते. पालखीमुळे बाजार आवाराची स्वच्छता करण्यात आली होती. फळबाजारातील काही व्यापारी खराब फळे तसेच पावसात भिजलेला शेतीमाल रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे डांबरी रस्त्यावर थर साचतो. त्यामुळे डांबरी रस्ते खराब झाल्यासारखे वाटते. रस्ता सफाई करण्यात आल्यानंतर पुन्हा डांबरी रस्ता दिसतो. खराब माल बाजारआवारात टाकून देण्यात आल्यामुळे चिखल तयार होतो. याबाबत आडत्यांना सूचना देण्यात येणार आहेत. बाजारआवारातील गटारांची पाहणी करण्यात आली. ज्या ठिकाणी पाणी तुंबते तेथे तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती