राज्यात पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपापासून खरा शेतकरी दूर असल्याचे सांगत पुण्यातील बाजार पूर्वपदावर आल्याचे मत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी रविवारी व्यक्त केले. यावेळी त्यांनी बाजार भावात १० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही सांगितले. ते म्हणाले की, राज्यात १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. परिणामी २ दिवस बाजारावर संपाचा अधिक प्रभाव जाणवला. मात्र, रविवारी चांगल्या प्रकारे आवक झाली. शेतकऱ्यांना माल घेऊन येताना काही अडचण असल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. संपाच्या पार्श्वभूमीवर बाजारात माल आणताना शेतकऱ्यांना समस्या येत असेल तर शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीशी संपर्क साधावा, त्यांना आम्ही मदत करु, असे त्यांनी म्हटले. राज्यात मागील तीन दिवसांपासून कर्जमाफी आणि शेतमालास हमी भाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या काळात बाजारात दुप्पट दराने पालेभाज्या खरेदी कराव्या लागल्या. मात्र, रविवारी पुण्यातील बाजाराची परिस्थिती सुधारल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील बाजारपेठेत ९०० गाडया दाखल झाल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने किरकोळ विक्रेत्यांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. शेतकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. या सर्व प्रश्नावर राज्य सरकार काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.