पिंपरी-चिंचवडमध्ये अमृत योजनेअंतर्गत दापोडी येथे खड्डा खोदण्याचे काम सुरू आहे. तेव्हा मातीचा ढिगारा अंगावर कोसळून नागेश जमादार हा बदली कामगार अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करणाऱ्या तीन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. यात घटनेत फायरमन विशाल जाधव हे शहिद झाले आहेत. त्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर दोन कर्मचाऱ्यांवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगार नागेश उशिरा पर्यंत मातीच्या ढिगाराच्या खाली अडकलेला होता. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि लष्कर यांचं पथक घटनास्थळी उशिरा पर्यंत बचावकार्य करत होते. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, रविवारी सायंकाळी सव्वा सहा च्या सुमारास बदली कामगार नागेश कल्याणी जमादार हा अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेले खडड्यात काम करत होता. तेव्हा त्याच्या अंगावर अचानक मातीचा ढिगारा कोसळला. त्याचा आवाज ऐकून शेजारीच असलेले ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे हे धावत आले. कामगार नागेश हा कंबर इतका मातीत अडकला होता. अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली त्यांना पाचारण करण्यात आले. तातडीने शहीद विशाल जाधव, सरोष फुंदे, निखिल गोगावले हे घटनास्थळी दाखल झाले. शिडीच्या साहाय्याने ते खड्ड्यात उतरले मदतीसाठी गेलेले तरुण ईश्वर आणि सीताराम यांना सुखरूप बाहेर काढले. कामगार नागेश ला काढण्याचे शर्तीचे प्रयत्न तीन ही कर्मचारी करत होते. तेव्हा पुन्हा मातीचा ढिगारा नागेश, विशाल, निखिल आणि सरोष यांच्या अंगावर कोसळला. विशाल यांचे तोंड खाली आणि पाय वर झाले याच स्थितीत अडकले होते. त्यानंतर अग्निशमन दलाचे दुसरे पथक, एनडीआरएफ, लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून कर्मचारी निखिल, सरोष आणि विशाल यांना खडड्याच्या बाहेर काढण्यात आले. मात्र, विशाल यांच्या औंध येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर निखिल आणि सरोष यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पाठीमागे एक दोन वर्षांची मुलगी आणि पत्नी आहे. त्यांचे वडील हणमंतराव जाधव हे पोलीस खात्यात होते ते निवृत्त झाले असून मुंबई येथे स्थायिक आहेत. जाधव कुटुंब हे मूळ सातारा येथील आहे. दरम्यान या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात आली असून या घटनेत ठेकेदाराला हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.