विधानपरिषदेचे माजी सभापती नारायण सिताराम फरांदे यांचे आज सकाळी पुण्यातील खासगी रुग्णालयात वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. घरात पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यावरील उपचारादरम्यान पुण्यातील रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. मुंबईमध्ये त्यांनी के.जे.सोमैय्या महाविद्यालयातही प्राध्यापक म्हणून काम केले. नारायण फरांदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील ओझर्डे या गावचे होते. सोलापूर येथे त्यांनी त्यांचे उच्च शिक्षण घेतले. तर कोपरगाव येथे नोकरीत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कामाची दखल घेत भाजपने त्यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले, तेही त्यांनी अतिशय उत्तमरितीने सांभाळले. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा निवडून गेले. एकदा विधान परिषद आमदारांमधून त्यांची निवड झाली होती. असे तीन वेळा ते विधान परिषेदवर निवडले गेले होते. विधानपरिषदेचे उपसभापती आणि नंतर सभापतीपदही त्यांनी भूषविले. देशातील सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापतींच्या फोरमचे ते अध्यक्ष होते. या फोरमचे मुंबईत त्यांनी संमेलनही घेतले होते. नगर जिल्ह्यातून त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविली, पण त्यांना त्यात यश आले नाही. ते पुणे विद्यापिठाचे मराठी विषय सुवर्णपदक विजेते असून अतिशय शांत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. उत्कृष्ट वक्ते म्हणूनही त्यांची ओळख होती.