पिंपरी-चिंचवडमध्ये किल्ले बनवा राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तर सातशेहून अधिक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या. गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि रक्षण होणं गरजेचं असल्याचा संदेश यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. सरकारने गड किल्ल्यांकडे लक्ष द्यावे आणि त्यांची डागडुजी करावी असं आवाहन यावेळी शिक्षकांकडून करण्यात आलं. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव, सहयोग नगर, पिंपरी, हिंजवडी, दिघी, इंद्रायणी नगर येथील काही शाळांमध्ये तसंच मिळेल त्या ठिकाणी किल्ले बनवा राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला विद्यार्थी आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. चिमुकल्या हातांनी तीन ते चार तास राबत मातीचे हुबेहूब किल्ले साकारले. त्यांचं कौतुक करण्यासाठी शिक्षक आणि पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची दुर्मिळ ठेवा जपण्याचा मौल्यवान सल्ला देण्यात आला. मांगी तुंगी, प्रतापगड, रायगड, मदनगड, विजयदुर्ग, पिंपळा किल्ला, कामण दुर्ग, शिवडीचा किल्ला असे असंख्य किल्ले या महोत्सवात पहायला मिळाले. सध्या मोबाईलच्या युगात मातीशी निगडीत खेळ नाहीत, मुलांना किल्यांविषयी माहिती व्हावी तसंच त्यांनी मातीचे किल्ले बनवावेत यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.