‘वन महोत्सवा’अंतर्गत पुण्यात १ जुलै रोजी एकाच दिवशी अठरा लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून वृक्षारोपणासाठी १४ लाख ६७ हजार खड्डे खणण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या बैठकीत मंगळवारी देण्यात आली. राज्य शासनातर्फे १ जुलै रोजी दोन कोटी झाडे लावण्याचे ठरवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्य़ातील या उपक्रमासाठीच्या तयारीविषयी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी माहिती दिली. राव म्हणाले, ‘‘राज्य शासनाच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्य़ात सुमारे अठरा लाख रोपे लावणे अपेक्षित आहे. जिल्ह्य़ाचे भौगोलिक क्षेत्र पाहता आपण जास्तीत जास्त वृक्ष लागवड करू शकतो. त्यासाठी तालुका स्तरावरही समिती नियुक्त करण्यात आली आहे. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी या समितीची बैठक घेऊन वृक्षारोपणाचे नियोजन करावे.’’ ग्रामीण भागात उपक्रमाचा प्रचार करणे, रोपांच्या वाहतुकीचे नियोजन, लागवडीनंतर रोपांचे संगोपन या गोष्टींसाठीही त्यांनी उपाययोजना कराव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी प्रत्येक विभागाने एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा आणि या अधिकाऱ्याने इतर विभागांसह सामाजिक वनीकरण विभागाच्या संपर्कात राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. विद्यार्थीही वृक्षारोपणास उत्सुक- स्वयंसेवकांची आवश्यकता शासनाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था व गट रस दाखवत आहेत. पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी मे महिन्यात बारामतीतील गावांना पाणी पुरवण्यासाठी सुरू केलेल्या ‘तहान’ या प्रकल्पाचा विस्तार करून त्यात १ जुलै रोजी ८ ते १० हजार झाडे लावण्याचे ठरवले आहे. वृक्षारोपणासाठी या विद्यार्थ्यांना आणखी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. ‘तहान’मधील सहभागी विद्यार्थी हिमांशू खाचणे म्हणाला, ‘‘सध्या आम्ही ३० विद्यार्थी असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करायचे तर अधिक स्वयंसेवक लागतील. बारामती भागात आम्ही पाणी पुरवत असलेल्या उंदवडी सुपे, देऊळगाव रसाळ आणि इतर चार गावांत झाडे लावण्याचे ठरवले असून त्यासाठी खड्डे खोदण्यासाठी गावकरी श्रमदान करणार आहेत. आम्ही या गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे तिथले सरपंच व गावक ऱ्यांशी आमचा संवाद आहे. रोपे आम्ही शासनाकडूनच घेणार असून त्यांच्या वाहतुकीचा खर्च आम्ही उचलू. लावल्या जाणाऱ्या झाडांना संबंधित ठिकाणच्या कुटुंबातील लहान बाळाचे वा दिवंगत व्यक्तीचे नाव देण्याचे आम्ही ठरवले असून तसे केल्यास गावकरीही झाडांची काळजी घेण्यात सहभागी होतील. तसेच दर एक वा दोन महिन्यांनी आमचे स्वयंसेवक जाऊन झाडांवर नजर ठेवतील.’’ अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ८६००९६७७९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्याने सांगितले.