पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. माहितीपटात कबीर कला मंचचे सदस्य असल्याने माहितीपटाचे स्क्रीनिंग बंद पाडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

एफटीआयआयमधील नाचीमुथू या विद्यार्थ्याने ‘व्होरा’ हा माहितीपट तयार केला होता. या माहिती पटात कबीर कला मंचचे कलाकार होते. काही राजकीय संघटनांच्या दबावामुळे एफटीआयआय प्रशासनाने माहितीपटाचे स्क्रीनिंग बंद केले, असा आरोप नाचीमुथूने केला आहे.

एफटीआयआय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहे. एफटीआयआयमध्ये स्क्रीनिंग पाहण्यासाठी बाहेरील व्यक्तीला बोलावले जात नाही. ते नियमात बसत नाही. त्यामुळे स्क्रीनिंगला परवानगी दिली नाही. आम्ही कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतला नसून संस्थेने नियमानुसार निर्णय घेतला आहे. तसेच नाचीमुथूच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

तर नाचीमुथू म्हणाला, सामाजिक विषयावर हा माहितीपट तयार करण्यात आला होता. त्यासाठी एफटीआयआय प्रशासनाची परवानगी देखील घेतली होती. या स्क्रीनिंगसाठी बाहेरील २० जण येणार होते. सर्व नियमानुसार करून देखील प्रशासनाने काही संघटनाच्या दबावाखाली येऊन स्क्रीनिंग करू दिले नाही, असा आरोप देखील त्याने केला.