आठवडाभरापासून गाजत असलेला राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा विषय पुण्यामधील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये दिसून आले. गड किल्ल्यांचा विकास करणाऱ्याच्या फडणवीस सरकारच्या धोरणांचा विरोध करणारे अनेक फलक पुण्यामधील विसर्जन मिरवणुकीमध्ये दिसून आले. या फलकांवर गड-किल्ल्यांचे महत्व सांगण्याबरोबर दूर्गप्रेमींनी सरकारच्या निर्णयाचा विरोधही केला. 'किल्ले हेच आपल्या राज्याचे सार आणि स्वराज्यलक्ष्मी आहेत', 'गडकोट आमचा अभिमान, आम्ही प्राणपणाने राखू त्यांचा सन्मान', 'किल्ले बांधण्यात जरी आपला हात नसला तरी किल्ले वाचवण्यात तरी आपला हातभार असू द्या' असे संदेश लिहिलेले फलक विसर्जन मिरवणुकीमध्ये पहायला मिळाले. या फलकांवर #किल्ले_वाचवा असा हॅशटॅग वापरल्याचे दिसत होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) राज्यातील २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आठवडाभरापूर्वी समोर आले होते. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच यामुळे पर्यटन वाढवण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या विषयावरुन वाद निर्माण झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासात महत्व असणाऱ्या कोणत्याही किल्ल्यांना हात लावला जाणार नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. राज्यातील 'वर्ग २' प्रकारातील किल्ल्यांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने धोरण आखले आहे.