लालबागचा राजा या गणपतीचे दर्शन घेताना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस अधिकारी आणि नागरिकांना धक्काबुकी झाल्याची घटना घडली आहे, असे प्रकार होता कामा नयेत. या सर्व घटना लक्षात घेता अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. तसेच अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या संभाजी भिडे वा कुणी मौलवींवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पवार यांनी गुरुवारी पुण्यात केली.

अजित पवार गुरुवारी पुण्यात केसरीवाडा येथील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवर त्यांनी भूमिका मांडली.

पवार म्हणाले, राज्यात ६५ हजार कोटी खर्च होऊन देखील सिंचन प्रकल्पाची टक्केवारी वाढली नाही. आमचे सरकार असताना हजारो कोटी कसे खर्च झाले, अशी विचारणा सध्याच्या सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली होती. आता त्यांनी सिंचन प्रकल्पाची माहिती द्यावी, अशी मागणी करीत त्यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

सध्याच्या सरकारने आणलेल्या पोकळ आकडेवारी, नोटबंदी, इंधन दरवाढ आणि महागाईमुळे जनता कंटाळली आहे. ही जनताच आगामी निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवेल, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.