पुण्यातल्या काही तरुणांना तीन-चार वर्षांपूर्वी गणराज ताटे या युवकाने एकत्र केले. त्याच्यात गणराजचे अनेक मित्रही होते. काही शहरातले होते तर काही ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेले होते. काही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी होते. समाजासाठी काही तरी करू या असा प्रस्ताव त्यांच्यासमोर होता. त्यातून विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी काही तरी करू या, असे निश्चित झाले. विशेष म्हणजे जे काम करायचे ते दुर्गम आणि डोंगराळ भागात करायचे असाही निश्चय सर्वानी केला आणि त्यातून सुरू झाली ग्रीनलाईफ फाउंडेशन ही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना साहाय्य करणारी संस्था. गणराज ताटे याचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले आणि आता तो स. प. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रात त्याने काही वर्षे कामाचा अनुभव घेतला. त्याच्याकडे या कामासाठी भोर तालुका देण्यात आला होता. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, या योजनांचा लाभ लोकांना मिळवून देणे, त्यासाठी लोकांना आवश्यक साहाय्य करणे यासह विविध कामे करण्याची संधी या निमित्ताने त्याला मिळाली. ही कामे करतानाच त्याने दुर्गम भागाची परिस्थिती पाहिली. विशेषत: अशा भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी योग्यप्रकारे मदत केली तर त्यांना चांगले शिक्षण मिळू शकेल, हेही गणराजच्या लक्षात आले. दुर्गम आणि डोंगराळ भागातील शाळांची अवस्था सुधारेल, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि सोयी-सुविधा मिळतील यासाठी आपणच एकत्र येऊन काही तरी केले पाहिजे, हा विचार गणराजने केला आणि त्याला त्याच्या मित्रमंडळींनी चांगली साथ दिली. त्यातून ग्रीनलाईफ फाउंडेशन हे काम संस्थेच्या रुपाने सुरू झाले. ही संस्था मुख्यत: भोर आणि वाई तालुक्यातील ज्या शाळा दुर्गम भागात आहेत त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे काम करते. शालेय साहित्य, सर्व प्रकारच्या वह्य़ा, स्टेशनरी याबरोबरच गोष्टीची पुस्तके वगैरे विविध प्रकारचे साहित्य संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. हे साहित्य संस्थेचे सर्व कार्यकर्ते शाळाशाळांमध्ये जाऊन देतात. तसेच वर्षभर त्या शाळांशी संपर्क ठेवून इतरही मदत केली जाते. त्यासाठी लागणारा सगळा निधी समाजातून गोळा केला जातो. या सर्व शाळा डोंगराळ भागात असल्यामुळे बहुतेक शाळांमध्ये वाचनालय नाही किंवा विद्यार्थ्यांसाठी गोष्टीची पुस्तकेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुढच्या टप्प्यात या शाळांमध्ये छोटी वाचनालये सुरू करण्याचा मानस असल्याचे गणेशने सांगितले.