महापालिकेच्या कारभारावर नाराजी की स्थानिक नेत्यांशी मतभेद

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी पालिका भारतीय जनता पक्षाकडे आल्यानंतर ओघानेच ‘कारभारी’पद पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे आले होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत पालकमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येते. महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी बापटांचे पत्रिकेत नाव असते. मात्र, ते हजर राहात नाहीत. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत, झाल्यास त्याचा अपेक्षित पाठपुरावा होत नाही. पालकमंत्री फारच व्यग्र असावेत, स्थानिक नेत्यांशी त्यांचे मतभेद असावेत किंवा त्यांनाच पिंपरीच्या राजकारणात रस नसावा, असा युक्तिवाद यासंदर्भात केला जातो.

अजित पवारांकडे पिंपरी पालिकेचा कारभार होता, तेव्हा महापालिकेतील जवळपास सर्वच विषयांवर अंतिम निर्णय तेच घेत होते. पालिका आयुक्तांवर, पालिका पदाधिकाऱ्यांवर तसेच नगरसेवकांवर पवारांचा जरब होता. अजित पवारांची वेळ घेऊन पालिकेच्या कार्यक्रमांचे नियोजन होत होते. भूमिपूजन, उद्घाटन, बैठका, जाहीर सभा असा त्यांचा भरगच्च दौरा आखला जात होता. सकाळी नऊपासूनच पवार शहरात येत होते आणि सायंकाळी उशिरापर्यंत ते तळ ठोकून बसत होते. गाडय़ांचा ताफा, अधिकाऱ्यांचा राबता, कार्यकर्त्यांची गर्दी, फलकबाजी यामुळे राष्ट्रवादीची जोरदार वातावरणनिर्मिती होत होती. पवारांच्या कार्यक्रमांना, सभांना प्रसारमाध्यमातून भरपूर प्रसिद्धीही मिळत होती. सत्तांतरानंतर आता तसे काही दिसून येत नाही. पालकमंत्री फारसे येतच नाहीत. त्यांचे नाव पालिकेच्या प्रत्येक पत्रिकेत छापलेले असते, मात्र ते कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. सांगवी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हजेरी लावली. चिंचवड नाटय़गृहात झालेल्या ‘गणेश फेस्टिव्हल’च्या कार्यक्रमासाठी ते आले होते. हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्याच कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती दिसून आली. अलीकडेच वर्धापनदिनी ते येणार होते. मात्र, त्यांनी पुन्हा दांडीच मारली. ते शहरात का येत नाहीत, याचे कोडे अनेकांना पडते. त्याचे कारण कोणाला सांगता येत नाही.

पालिका ताब्यात येण्यापूर्वी पिंपरी-चिंचवडशी संबंधित प्रत्येक विषयात बापट यांची भूमिका होती. शिवसेनेशी युती करावी की नाही, इथपासून ते पक्षाचा निवडणूक जाहीरनामा कसा असावा, यात बापट यांचे म्हणणे महत्त्वपूर्ण मानले जात होते. जाहीरनाम्याचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते झाले होते, तेव्हा पिंपरी-चिंचवडसाठी आपण काय करणार आणि कसे करणार याची सविस्तर जंत्री त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली होती. प्रत्यक्षात, तसे काही होताना दिसत नाही. मुळातच ते शहरात कमी येतात. मोजक्याच बैठका त्यांनी घेतल्या, त्या विषयांचा पुढे अपेक्षित पाठपुरावा झाला नाही. पक्षाच्या पिंपरीतील कारभारावर पालकमंत्री नाखूश आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांच्या उपस्थितीत ‘कलासागर’ येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. स्थानिक नेत्यांना सूचक शब्दांत त्यांनी फटकारलेही होते.